स्वातंत्र्य म्हटल्यावर तुम्ही बंदी कशी आणता? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

Raj Thackeray | १५ ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील कत्तलखाने बंद ठेवण्याबरोबरच मटण-मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये १५ ऑगस्ट रोजी मटणाची मेजवाणी ठेवण्याचा इशारा काही राजकीय नेत्यांनी दिल्यानंतर पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. शहरात मटण, मांस खाण्यावर नाही तर विक्रीवर बंदी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयावर आता मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे.
राज ठाकरे म्हणाले, की आमच्या लोकांना हे सर्व चालू ठेवण्यास सांगितले आहे. महानगरपालिकेला या गोष्टीचे अधिकार नाहीत. कुणी काय खावे आणि कुणी काय खाऊ नये? हे ठरविण्याचे अधिकार सरकार आणि महानगरपालिकेचे नाहीत.” एका बाजूला स्वातंत्र्यदिन साजरा करायचा आणि दुसऱ्या बाजूला लोकांना खायचे स्वातंत्र्य नाही?, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा : शिक्षण विश्व: अग्निशामक दलात सायबर जनजागृती मोहीम उत्साहात
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कशावर तरी बंदी आणणे हाच मोठा विरोधाभास आहे. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन दिवस आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. या दोन दिवशी तुम्ही बंदी कशी काय आणू शकता? कुणाचा काय धर्म, कुणाचे काय सण आहेत? यानुसार कुणी काय खावे, हे सरकारने सांगण्याची गरज नाही.
कबुतरखान्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्याप्रमाणे सर्वांना वागावे लागेल. जैन मुनींनी या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांवर बंदी घातली आहे, तर त्याप्रकारे ती गोष्ट झाली पाहिजे. कबुतरांमुळे कोणत्या प्रकारचे रोग होतात, याबद्दल अनेक डॉक्टरांनी माहिती दिली आहे. कबुतरांना खायला देऊ नये, असे उच्च न्यायालयाने सांगूनही जर कुणी खायला टाकत असेल तर त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे. धर्माच्या नावावर खायला टाकत असाल तर ते चुकीचे आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.




