‘पैशांचा वापर करून शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष फोडले’; राहुल गांधींचा आरोप

मुंबई | काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा शुक्रवारी भिवंडीत दाखल झाली. येथे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात निवडणूक रोखे ही योजना आणली होती. या योजनेचे सत्य आता जनतेला कळले असून या योजनेच्या माध्यमातून भ्रष्टाचार झाला आहे. जगातील हा सर्वात एक मोठा घोटाळा आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले की, ईडी आणि सीबीआय या तपास यंत्रणाकडून कंपन्याना कारवाईचे भय दाखविले जाते आणि त्यांच्यावर दबाब टाकला जातो. यानंतर त्या कंपन्याकडून निवडणूक रोखे स्वरूपात भाजप खंडणी उखळते. याचे उदाहरण म्हणजे शेल कंपनी आहे. तसेच बांधकाम तसेच इतर अशी मोठी कंत्राटे ज्या कंपन्याना देण्यात आली, त्यांच्याकडूनही निवडणूक रोखे स्वरूपात हफ्ते घेण्यात आले आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
हेही वाचा – ‘शिवसेना-राष्ट्रवादी पक्ष आम्ही फोडले नाहीत’; सत्तासंघर्षावर अमित शाहांचं वक्तव्य
निवडणूक रोखे हा भ्रष्टाचार म्हणजे देशविरोधी कृत्य आहे. भाजपचे सरकार कधी न कधी जाईल आणि आमचे सरकार सत्तेवर येईल. त्यावेळी या घोटाळ्याची चौकशी करून अशी कारवाई करू की यापुढे असे करायची कुणाची हिंमत होणार नाही. ईडी आणि सीबीआय या तपास यंत्रणा आता देशाच्या राहिलेल्या नाहीत. या यंत्रणा आता भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करीत आहेत. या यंत्रणांनी त्यांचे काम केले असते तर निवडणूक रोखे घोटाळा झालाच नसता. निवडणूक रोखे ही कल्पनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणली असून यामुळे तेच या खंडणी प्रकरणाचे करते करविते आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.
निवडणूक रोखेच्या माध्यमातून भाजपने पैसे कमविले आणि याच पैशातून त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षात फूट पडली. तसेच पैसे आणि तपास यंत्रणाकडून दबाब टाकून भाजपने महाराष्ट्रातील सरकार पाडले, असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला.





