‘दगडफेकीच्या घटनेचं षडयंत्र राजेश टोपेंच्या कारखान्यात’; प्रवीण दरेकरांचा गंभीर आरोप

मुंबई | विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज मनोज जरांगे पाटलांच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मागणी केल्यानंतर जरांगेंचं आंदोलन आणि त्यांचे आरोप यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
प्रवीण दरेकर म्हणाले की, दगडफेक करण्यासाठी ट्रॅक्टरमधून दगडं आणण्यात आली. यासंदर्भात अटकेतील आरोपी हे सांगतोय. त्याची चौकशी व्हायला हवी. बारस्कर, संगीता वानखेडे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. हा कट करणाऱ्यांची एसआयटी चौकशी केली पाहिजे.
नारायण राणेंनी कानाखाली मारली असती म्हटलं, तर त्यांना तुरुंगात टाकलं. मग राज्यात सगळ्यांना समान न्याय पाहिजे. जर जरांगे उपमुख्यमंत्र्यांबाबत अश्लाघ्य वक्तव्य करत असेल, तर जरांगेंची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांना अटक केली पाहिजे, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
हेही वाचा – ‘मनोज जरांगे बीड लोकसभेसाठी मविआचे उमेदवार असणार’; भाजपा नेत्याचं मोठं विधान
जेसीबींनी फुलं उधळली गेली. लाखोंच्या सभा झाल्या. या सभांना, जेसीबींना पैसे कुणी दिले? याची चौकशी व्हायला हवी. संगीता वानखेडेंनी जरांगेंवर आरोप केले आहेत. बारस्कर महाराजांनी सांगितलं तेच बरोबर आहे, जरांगे कुणालाच विश्वासात घेत नव्हते. फक्त एक फोन घेत होते. तो फोन शरद पवारांचाच होता, असा आरोप संगीता वानखेडेंनी केला आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
‘शरद पवार मनोज जरांगेंना फोन करत होते. आंदोलनाचा सगळा खर्च शरद पवारांनी केला आहे. मनोज जरांगेंचे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसनं लावले. शरद पवार जसं सांगतात, तसंच मनोज जरांगे करतात. आरक्षणाचे मारेकरी शरद पवार आहेत’, असा आरोप संगीाता वानखेडेंनी केला आहे. राजेश टोपेंच्या कारखान्यावर या सगळ्या प्रकाराचं षडयंत्र रचलं गेलं’, असा दावाही संगीता वानखेडेंनी केला आहे, असंही प्रवीण दरेकर म्हणाले.





