पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण: पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता!

मुंबई | सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित आणि हायप्रोफाईल पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा तब्बल दोन दशकांनंतर (२० वर्षांनी) अंतिम निकाल लागला आहे. या खटल्यात विशेष न्यायालयाने मोठा निर्णय देत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर सर्व आठ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालामुळे ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
न्यायालयाने हा निकाल देताना तपासातील त्रुटी आणि पुराव्यांच्या कमतरतेवर बोट ठेवले. न्यायालयाने स्पष्ट केले की, या प्रकरणातील मुख्य आरोपींविरुद्ध सरकारी पक्षाला सबळ पुरावे सादर करता आले नाहीत. तसेच, या खटल्यातील ‘माफीचा साक्षीदार’ हा विश्वासू आणि खात्रीशीर वाटत नसल्याने, केवळ त्याच्या जबाबाच्या आधारावर आरोपींना इतकी मोठी शिक्षा देता येऊ शकत नाही, असे म्हणत कोर्टाने पद्मसिंह पाटील आणि इतर ८ आरोपींना दोषमुक्त केले.
हेही वाचा
पुणे महानगर प्रदेशातील वाहतूककोंडी फुटणार!
काय आहे नेमकं प्रकरण?
राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन मातब्बर नेते आणि माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर भाडोत्री गुंडांमार्फत ही राजकीय हत्या घडवून आणल्याचा गंभीर आरोप होता. ३ जून २००६ रोजी पवनराजे निंबाळकर हे मुंबईवरून आपल्या गाडीने धाराशिवकडे (उस्मानाबाद) निघाले होते. त्यांची गाडी नवी मुंबईतील कळंबोली जवळ आली असता, दोन अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांची गाडी अडवली. काही समजण्याच्या आतच मारेकऱ्यांनी पवनराजे यांच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या. या भीषण हल्ल्यात पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा ड्रायव्हर समद काझी या दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता.
ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबाला मोठा धक्का!
या हत्याकांडामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. पवनराजे यांचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या न्यायासाठी प्रदीर्घ कायदेशीर लढाई लढली होती. मात्र, तब्बल २० वर्षांनंतर आलेल्या या निकालात सर्वच आरोपी पुराव्याअभावी सुटल्याने निंबाळकर कुटुंबाला कायदेशीर पातळीवर मोठा धक्का बसला आहे. या निकालाचे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत.





