गृहमंत्र्यांच्या होम ग्राऊंड नागपूरची नवी ओळख ‘क्राईम कॅपिटल’ अशी होणार?

नववर्षाच्या पहिल्या दोन आठवड्यातच नागपूर शहरात ५ खून
नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम ग्राऊंड नागपूरची अवस्था अतिशय भयावह झाली आहे. नागपूर शहरात नववर्षाच्या पहिल्या दोन आठवड्यातच पाच खून झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या शहरातच गुन्हेगारी रोखण्यात आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यात माननीय गृहमंत्र्यांना यश मिळत नसेल तर संपूर्ण राज्याचा कारभार कसा सुरळीत राहील हा गंभीर प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उपस्थित केला आहे.
यापूर्वीही सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याची जबाबदारी सांभाळली होती. मात्र तेव्हाही गुन्हेगारीमध्ये नागपूर शहर राज्यात अव्वल होते. नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी घेण्यासाठी सक्षम गृहमंत्र्यांची राज्याला आवश्यकता आहे. राज्यात मंत्रिमंडळ विस्तार करायचा नाही, कामकाजापेक्षा राजकीय टीका करण्यात धन्यता मानायची, अशा तऱ्हेने राज्यातील गुन्हेगारीला आळा बसणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
मागील वर्षात गुन्हेगारी कमी झाल्याचं नागपूर पोलिसांनी सांगितले. मात्र या वर्षाची सुरवात हत्याच्या घटनांनी झाली. गेल्या 9 दिवसांत चार हत्येच्या घटना नागपुरात घडल्यात. या हत्यांच्या या घटनांमुळं नागपूर हादरलं आहे. यामुळं नागपूर पुन्हा क्राईम कॅपिटलकडे जात आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं.
गेल्या काही दिवसांत नागपूर शहरात दोन हत्येच्या घटना घडल्यात. त्यात एक कळमना पोलीस स्टेशन हद्दीत घडली. गाडीला कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एकाचा खून करण्यात आला. दुसरी घटना हिंगणा पोलीस स्टेशन हद्दीत घडली. पत्नीच्या चारित्र्याबद्दल बोलल्याच्या कारणावरून एकाने दुसऱ्याची गोळी घालून हत्या केली. त्यामुळे नवीन वर्षात 9 दिवसांत चार हत्या झाल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मात्र पोलीस यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगतात. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत असल्याचं सांगितलं.





