‘मुंबई-गोवा महामार्ग जून २०२५ पर्यंत पूर्ण होणार’; नितीन गडकरी

Nitin Gadkari | गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला आता गती मिळाली असून, येत्या जून २०२५ पर्यंत हा रस्ता १०० टक्के पूर्ण होईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. दादर येथील अमर हिंद मंडळाच्या ८७ व्या वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले, की मुंबई-गोवा महामार्गासाठी खूप अडचणी आल्या, पण तुम्ही काळजी करू नका. या वर्षीच्या जूनपर्यंत हा रस्ता १०० टक्के पूर्ण होणार. हा रस्ता बराच रेंगाळला. दिल्ली-जयपूर आणि मुंबई-गोवा आमच्या विभागातील ब्लॅक स्पॉट्स आहेत. त्याच्या अडचणी खूप आहेत. कोकणातील सत्य सांगितलं तर तुम्हाला चालणार नाही. पण १४ ते १५ जण ३ एकर शेतीचे मालक. त्यांच्यात भावा-भावांमध्ये भांडणं. कोर्ट केसेस झाल्या. त्या जमिनीच्या मोबदला देता देता पुरेवाट लागली.पण समस्या सुटली आहे.
हेही वाचा : पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा कुस्ती आखाडा “भैरवनाथ केसरी”
येणाऱ्या काळात रस्त्याचे दर वाढले आहेत. नक्कीच या काळात रस्त्याच्या समस्या राहणार नाहीत. आम्ही ३ लाख कोटी रुपयांचे रस्ते नॉर्थ इस्टमध्ये बांधतोय. तुम्हाला मी विनंती करेन, तुम्ही दोन ठिकाणी जरूर जा. श्रीनगरच्या पुढे जा. मनालीवरून रोतांगपासला जायला साडेतीन तास लागायचे. आता आम्ही अटल टनेल बांधला आहे. आता आठ मिनिटांत जाता येतं. त्या अटल टनेलवरून बाहेर आल्यानंतर लेह-लदाख येथे अत्यंत सुंदर हिमालय आहे. तिथे ९ टनेल बांधतोय, असं नितीन गडकरी म्हणाले.
सर्वांत मोठी टनेल बांधतोय तो झोझिला. मायनस ८ डिग्री तापमानात हे टनेल बांधतोय. या टनेलचं ७० ट्क्के काम झालं असून आतापर्यंत याचं ५ वेळा टेंडर काढलं आहे. सरकारी दफ्तरात याची कॉस्ट होती १२ हजार कोटी. मला सांगताना आनंद होतोय, हे केवळ ५ हजार ५०० कोटी रुपयांत बांधलंय. तिथून बाबा अमरनाथचं दर्शन होऊ शकतं, असं नितीन गडकरी म्हणाले.