पंच्यात्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावे; सरसंघचालक मोहन भागवत यांचे सूचक वक्तव्य

Mohan Bhagwat | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रदीर्घ काळ प्रचारक राहिलेले आणि हिंदू जागरणाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे मोरोपंत पिंगळे यांच्या जीवनावर आधारित चरित्र ग्रंथाचे प्रकाशन आज सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यादरम्यान भागवत यांनी केलेल्या एका सूचक विधानाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवली आहे.
मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?
मोरोपंत यांच्याबाबतचं पुस्तकाचं महत्त्व हे प्रेरणा या दृष्टीने आहे. मोरोपंत यांच्या आयुष्यात सगळ्यांना चटक लक्षात येणारी गोष्ट म्हणजे त्यांची भव्य शरीरयष्टी. त्यांनीच एक प्रसंग सांगितला होता. घरी पाहुणे आले की मुलं कोण आलं असं विचारतात. जेव्हा मी घरी जातो तेव्हा मुलं विचारतात आई हे काय आलं? अशी त्यांची शरीरयष्टी होती. बाल स्वयंसेवकांना त्यांचा आधार वाटत असे. तसंच त्यांचा स्वभाव अतिशय विनोदी होता अशी आठवण मोरोपंत पिंगळे यांच्याबाबत मोहन भागवत यांनी सांगितली. तसेच, मोरोपंत पिंगळे एकदा म्हणाले होते की जेव्हा पंचाहात्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं, तुमचं वय झालं आहे; बाजूला सरा, आम्हाला काम करु द्या, असंही मोहन भागवत म्हणाले.
हेही वाचा : शिक्षकांच्या आंदोलनाला यश! 20 टक्के वाढीव पगार लवकरच खात्यात जमा, सरकारचा मोठा निर्णय
रामजन्मभूमीच्या आंदोलनाबाबत मोरोपंत पिंगळे यांना विचारलं गेलं की तुम्ही या आंदोलनाचे आर्किटेक्ट आहात. त्यावर ते क्षणाचाही विलंब न करता म्हणाले तुम्ही जे विचारायचं आहे ते अशोक सिंघल यांना विचारा. आंदोलन करायचं ठरलं म्हणून आम्ही त्यात सहभागी झालो. मी केलं हे सांगण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. डोंगराइतकं कर्तृत्व पण ते सगळं संघ शरण, मी केलं, मी ही होतो असंही त्यांनी कधी सांगितलं नाही. सामान्य माणूस कर्मामध्ये आसक्त होऊन काम करतात. लोकसंग्रह करणारेही लोक असेच आसक्त वाटतात पण ते निरासक्त असतात. मोरोपंतांनी जी सगळी कामं केली त्यात त्यांची रुची होती की नाही हे त्यांनाच माहीत. पण राष्ट्रकार्य करतो आहोत ही भावना होती. शिवाय कुठलंही काम त्यांनी करायचं म्हणून केलं नाही. जे काही केलं ते सगळं विचारपूर्वक केलं. मोरोपंतांसारखं व्हायला दृढनिश्चय लागतो, हा दृढनिश्चय समर्पणातून येतो, असंही मोहन भागवत म्हणाले.





