‘काही लोक आधी सुपरमॅन, त्यानंतर पूजनीय आणि नंतर देव बनू पाहतात’; सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य

Mohan Bhagwat | झारखंडमधील एका एकार्यक्रमात बोलत असताना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मानवी महत्त्वाकांक्षेबाबत भाष्य केले. काही लोक आधी सुपरमॅन (महापुरुष), त्यानंतर पूजनीय आणि पूजनीय नंतर देव बनू पाहत आहेत, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाची आता जोरदार चर्चा होत आहे. ‘विकास भारती’ या ना-नफा संस्थेने आयोजित केलेल्या ग्रामस्तरीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत सरसंघचालक बोलत होते.
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, जेवढा विकास करण्याचा विचार केला होता, तिथवर आपण पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर दिसते की, यापुढेही बरेच काही करण्यासारखे आहे. पण ज्या माणसात माणुसकी नाही, त्याने आधी माणूस बनावे. पण काही लोक विकासाच्या निर्धारीत टप्प्यावर पोहोचल्यावर मानवाचे सुपरमॅन बनू पाहतात. सुपरमॅन बनल्यावरही ते थांबत नाहीत, त्यांना वाटते आता पूजनीय बनायला हवे. पण पूजनीय म्हणतात आमच्यापेक्षा देव मोठे, तर देव म्हणतो माझ्यापेक्षा विश्वरुप मोठे. आता विश्वरुपाच्या पुढेही काही आहे का? हे कुणाला माहीत नाही. विकासाचा काही अंत नाही. ही निरंतर चालत राहणारी प्रक्रिया आहे.
हेही वाचा – योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार खपवून घेणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा
गेल्या २००० वर्षांत वेगवेगळे प्रयोग केले गेले, पण ते भारताच्या पारंपरिक जीवन पद्धतीत रुजलेले आनंद आणि शांती देण्यात अयशस्वी ठरले. करोनानंतर जगाला कळले की भारताकडे शांती आणि आनंदाचा रोडमॅप आहे. विकासाचा काही अंत नसतो. तुम्ही काही झाडे लावली. पण झाड लावणे, हे सुरूच राहिले पाहीजे. सर्वांना शिक्षण दिले, पण नवी पिढी येईल, तिलाही शिक्षण मिळाले पाहिजे, शिक्षण निरंतर चालत राहिले पाहिजे. आरोग्याचा प्रश्न असेल, यात सातत्याने काम करत राहिले तरच समाधान मिळू शकेल, असंही मोहन भागवत म्हणाले.
दरम्यान, मोहन भागवत यांच्या या विधानानंतर काँग्रेसचे सरचिटणीस खासदार जयराम रमेश म्हणाले, स्वयंभू नॉन-बायोलॉजिकल पंतप्रधानांना या ताज्या अग्नी क्षेपणास्त्राची माहिती मिळालीच असेल, असा मला विश्वास वाटतो. नागपूरने (भागवत) झारखंडहून लोक कल्याण मार्गावर (पंतप्रधान निवास) निशाणा साधला आहे.





