मंत्री गिरीश महाजनांची शिष्टाई फळाला, तीन दिवसानंतर रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन मागे, नेमकं काय दिलं आश्वासन?

Rohit Pawar : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे गेल्या तीन दिवसांपासून पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरु होते. आज अखेर त्यांनी तीन दिवसानंतर उपोषण सोडले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रोहित पवारांनी उपोषण मागे घेतले. 22 जूनच्या आधी मुंबईत बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावल्याची माहिती रोहित पवार यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या वतीने 4 जुलैला मोठे आंदोलन घेणार आहोत असे रोहित पवार म्हणाले. आपली बैठक ठरली आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये ही आमची भूमिका असल्याचे रोहित पवार म्हणाले. यावेळी रोहित पवार यांनी गिरीश महाजन यांचे अभिनंदन केले. कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले आहे. मी ज्या मतदारसंघात काम करतो तिथेच अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला आहे. सरकारनं काढलेला जीआर महत्वाचा आहे. सरकारचे अभिनंदन करतो. फक्त या जीआरमध्ये अनेक अटी आहेत.
हेही वाचा – मोसमी पावसाची वाट खडतरच… राज्यात काही भागात उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती
यामुळं अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. 2019 ची कर्जमाफी झाली. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला त्यांना आताच्या या योजनेमध्ये लाभ मिळणार नाही. ही अटक काढा असे रोहित पवार म्हणाले. सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी आहे. रविकांत तुपकर बुलढाण्यात ते आंदोलन करत आहेत. त्यांना देखील भेटा असे रोहित पवार म्हणाले. रेग्युलर शेतकऱ्यांना 50 हजारांचे लिमिट आहे ते वाढवाले पाहिजे असे रोहित पवार म्हणाले.
सरकारला विनंती आहे की, येणारं वर्ष कठीण आहे यंदा पाऊस कमी पडणार आहे. शेतात काही पिकणार नाही. पिके जळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं कर्जमाफी योजना अटीशिवाय लागू करणं गरजेचं आहे असे रोहित पवार म्हणाले. त्याचबरोबर 1 रुपयामध्ये जी पिक विमा योजना होती. ती पिक विमा योजना परत सुरु करावी अशी विनंती देखील रोहित पवार यांनी केली आहे.





