‘फडणवीस साहेब आचारसंहितापूर्वी आरक्षण द्या, अन्यथा..’; मनोज जरांगेंचा इशारा
![Manoj Jarange Patil said that give reservation before Fadnavis code of conduct](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Manoj-Jarange-Patil-1-780x470.jpg)
Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा करत आहेत. आज ते सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधला आहे. फडणवीस साहेब आचारसंहितापूर्वी आरक्षण द्या, अन्यथा मराठा तुमचा सुपडासाफ करतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील मराछा कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती गठीत करण्यात आली आहे. दरम्यान, शिंदे समितीच्या वतीने शोधण्यात येत असलेल्या कुणबी नोंदींची संख्या आणखी वाढली आहे. यापूर्वी ५७ लाख नोंदी सापडल्याचा दावा जरांगे यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र, आता याच नोंदी वाढल्या असून, आकडा ६३ लाखांवर पोहचला आहे. ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांच्यासह सुमारे १ कोटी लोकांना आरक्षण मिळणार आहे. तसेच ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना सगेसोयरे कायज्यानुसार आरक्षण मिळेल.
फडणवीस साहेब आचारसंहितापूर्वी आरक्षण द्या, अन्यथा मराठा तुमचा सुपडासाफ करतील. जर अशीच दडपशाही सुरु राहिल्यास आधी दोन कोटी मराठे एकत्रित आले होते, आता हाक दिल्यास चार कोटी मराठे एकत्रित येऊन त्यांना पाणी पाजतील, असं मनोज जरांगे म्हणाले.
हेही वाचा – मार्च महिन्यातच पूर्ण करा ‘ही’ ५ महत्वाची कामे! अन्यथा वाढतील अडचणी
निवडणुकीत निवडून येण्यासाठी तुम्हाला मराठे लागतात, पण यांच्या नेत्यावर बोलले की सगळे तुटून पडतात. पण तुझ्या नेत्याचेचं टांगा पलटी केल्यावर काय करणार?. गोरगरीब मराठ्यांचे मुलं देखील मोठे झाली पाहिजे यासाठी मी लढत आहेत. तुम्हाला नेत्यापेक्षा जास्त जात महत्वाची पाहिजे. पण, जर तुमच्यासाठी नेता मोठा असेल तर जातीकडे येऊ नयेत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
सत्ता आणि मराठा यांच्यातील काटा म्हणजे मनोज जरांगे पाटील असून, त्याला दूर करा, गुंतवा असे धोरण यांनी घेतले आहे. मला जेलमध्ये घातले तरी तिथेही आंदोलन करणार. जेलमधील मराठ्यांना आरक्षण शिकवेल. मुस्लिम, धनगर हे देखील सोबत घेईन. माझी मान कापली, तरी आता ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. मला कोणतेही पद नको, मी आई-बापाला बाजूला केलं. या समाजाने मला आई-बापाची आठवण येऊ दिली नाही, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.