‘भाजपला २०२४ ला सगळ्यात मोठा फटका बसणार’; मनोज जरांगेंचा इशारा

Manoj Jarange Patil | गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा इशारा दिलेला आहे. यानंतर आता मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी माझ्यापाशी येतात आणि सांगतात की आमची फसगत झाली आहे. आम्ही समाजाचेही राहिलो नाहीत आणि पक्षाचेही राहिलो नाहीत. ते तुमच्याबरोबर नाईलाजाने राहिले आहेत. तुम्ही जे गणित मांडलं आहे ना? तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा फटका तुम्हाला २०२४ च्या निवडणुकीत बसणार आहे. हा माझा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा पश्चाताप तो असणार आहे.
हेही वाचा – धक्कादायक : पिंपरी मतदारसंघात दुबार ओळखपत्रांसह सात हजार नावे!
राज्यातील शेतकरी आणि मराठा समाजाला शेवटी सहन होईल तोपर्यंत होईल. शेवटी लोक विचार करणार आहेत की सरकारला काय करायचं ते करुद्या. काय गुन्हे दाखल करायचे ते करुद्या. देवेंद्र फडणवीस यांना काय दादागिरी करायची ते करुद्या. मराठा समाजाचे काही आमदार आमच्या अंगावर घालायचे ते घालूद्या, पण निवडणुकीत त्यांना पाडायचं, असं मनोज जरांगे म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची भाषा आतापर्यंत दोनदा केली. त्यामुळे याचा अर्थ असा वाटतो की यामध्ये त्यांचाच दोष आहे. कारण या राज्याचे राज्यकर्ते ते आहेत. तुम्ही मराठा समाजाचं आरक्षण रोखलं हे सत्य आहे. तुम्ही ते आरक्षण द्या ना? सगेसोयरेची अंमलबजावणी तुम्ही रोखली. हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे तुम्ही आणखीनही मराठ्यांचा द्वेष सोडून द्या. तुम्ही छगन भुजबळ यांचं ऐकू नका. देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या विरोधात आंदोलन करायला लावली. एवढंच नाही तर ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांना एकत्र करायला लावली, अशी टीकाही मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.





