मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इंडियाचे खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून उतरले मैदानात
अनेक माजी खेळाडूंनी दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंह यांना वाहिली श्रद्धांजली
मेलबर्न : बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्नमध्ये सुरु असून दुसरा दिवस आहे. या सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. एखादा मोठा क्रिकेटपटू किंवा देशाच्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाबाबत शोक व्यक्त करावा लागतो तेव्हा टीम इंडिया काळी पट्टी बांधून मैदानात उतरते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. 26 डिसेंबरच्या रात्री माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशावर शोककला पसरली आहे. मनमोहन सिंह 2004 ते 2014 या कालावधीत सलग 10 वर्षे देशाचे पंतप्रधान होते. गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर सर्वोतोपरी उपचार केले गेले पण त्यात यश मिळालं नाही. 2004 ते 2014 पर्यंत भारताचे पंतप्रधान असलेले मनमोहन सिंग हे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर सर्वाधिक काळ हे पद भूषवणारे भारताचे चौथे पंतप्रधान बनले.
टीम इंडियाच्या अनेक माजी खेळाडूंनी दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याप्रती सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. वीरेंद्र सेहवाग, ज्याने त्याच्या एक्स खात्यावर शोक व्यक्त करत लिहिलं की, ‘आमचे माजी पंतप्रधान श्री मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. ओम शांती’ भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनेही शोक व्यक्त करत म्हटले की, ‘डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची दु:खद बातमी. भारताच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेणारे द्रष्टे नेते आणि खरे राजकारणी. त्यांची बुद्धी आणि नम्रता सदैव स्मरणात राहील. त्यांच्या प्रियजनांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना.’
दरम्यान, बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत आहे. लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाने 450 पार धावा केल्या आहेत. अजूनही स्टीव्ह स्मिथ मैदानात तग धरून असल्याने ही धावसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीम इंडियापुढे पहिल्याच डावात मोठं संकट उभं राहिलं आहे.





