महाराष्ट्राची विविध कंपन्यांशी सामंजस्य करार ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या उपस्थितीत १७ सामंजस्य करार

मुंबई | श्री गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज तब्बल १७ सामंजस्य करारांवर (MoU) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारांची एकूण किंमत सुमारे ३३,७६८.८९ कोटी रुपये असून, त्यातून राज्यात सुमारे ३३,४८३ रोजगारनिर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिली.
या गुंतवणुकीत इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, सोलार, इलेक्ट्रिक बसेस व ट्रक्स, संरक्षण व त्यासंबंधित विविध क्षेत्रांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, पुणे, विदर्भ, कोकण अशा सर्वच भागांमध्ये उद्योग उभारणीची संधी उपलब्ध होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात सहज आणि सुरळीत अनुभव मिळावा यासाठी सरकार वचनबद्ध आहे. आम्ही फक्त करार स्वाक्षरीत करून थांबणार नाही, तर गुंतवणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर राज्य शासन भागीदार म्हणून सोबत राहील. याबाबत कुठेही अडथळा येणार नाही.”
यावेळी त्यांनी मैत्री पोर्टल (Maitri Portal) या वन-स्टॉप संकल्पनेचा विशेष उल्लेख केला. उद्योगांसाठी जमीन, परवानग्या आणि इतर मंजुरी तातडीने मिळवून देण्याबाबत शासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
ऊर्जाविषयक निर्णयांचा उल्लेख करताना श्री.फडणवीस म्हणाले की, “राज्यात नुकताच ५ वर्षांचा मल्टी-इयर टॅरिफ मंजूर झाला असून, वीजदर वर्षागणिक कमी होणार आहेत. पूर्वी दरवर्षी वीजदर ९ टक्क्यांनी वाढत असत, पण आता विजेचे दर कमी होणार आहेत. हे उद्योगांसाठी मोठे दिलासादायक ठरणार आहे.”
मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी पुढे सांगितले की, उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीचा जीवनचक्र (Investment Life Cycle) राज्य सरकारने स्थिर आणि अंदाजपत्रित ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वृद्धिंगत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या करारादरम्यान मुख्य सचिव राजेश कुमार, उद्योग सचिव डॉ.पी. अन्बळगन, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीनकुमार सोना, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.





