नितीश कुमार यांना इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाची ऑफर; जदयूच्या नेत्याचा मोठा खुलासा

Nitish Kumar | लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने ५४३ पैकी २३४ जागांवर विजय मिळविला. तर एनडीएने २९३ जागांवर विजय मिळविला आहे. भाजपाला बहुमतापेक्षा ३२ जागा कमी मिळाल्या आहेत. त्यामुळे जदयूचे नितीश कुमार आणि टीडीपीचे चंद्राबाबू नायडू हे किंगमेकरच्या भूमिकेत असल्यामुळे या दोन्ही नेत्यांकडे देशाचे लक्ष लागले आहे. यातच, जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते केसी त्यागी यांनी मोठा खुलासा केला आहे.
जदयूचे नेते केसी त्यागी म्हणाले की, इंडिया आघाडीकडून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलाचे (यू) नेते नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली आहे. मात्र नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीत सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिला. ज्या लोकांनी इंडिया आघाडीचे संयोजक पद नितीश कुमार यांना देऊ केले नाही, ते लोक आता पंतप्रधान पदाची प्रस्ताव देत आहेत. नितीश कुमार यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला असून आम्ही एनडीएबरोबर ठामपणे उभे आहोत.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाळ्यात रस्ते खोदाई केल्यास ‘फौजदारी’!
इंडिया आघाडीतील कोणत्या नेत्याने तुमच्याशी संपर्क साधून ही ऑफर दिली, असा प्रश्न विचारला असता केसी त्यागी यांनी त्या नेत्याचे नाव जाहीर करण्यास नकार दिला. ते म्हणाले की, काही नेत्यांनी थेट नितीश कुमार यांची भेट घेऊन त्यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली. पण आम्हाला आणि आमच्या ज्येष्ठ नेत्यांना मिळालेल्या वागणुकीनंतर आम्ही इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही एनडीएत असून मागे जाण्याचा प्रश्नच येत नाही.
दरम्यान, जनता दल युनायटेड (जदयू) १२ खासदार, तेलगू देसम पक्ष (टीडीपी) १६ खासदार, शिवसेना शिंदे गट ७ खासदार आणि बिहारमधील लोक जनशक्ती पार्टी (पासवान गट) ५ खासदार यांचा सरकार स्थापन करण्यात महत्त्वाचा वाटा असणार आहे.





