मला बीडचं पालकत्व मिळालं असतं, तर..; पंकजा मुंडे यांचं विधान
मला जालन्याची जबाबदारी, ती मी पार पाडेन : पंकजा मुंडे

Pankaja Munde | राज्यातील पालकमंत्री पदाची यादी १८ जानेवारीला जाहीर करण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहर तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आले, पण पंकजा मुंडे यांची संधी हुकली. आता पालकमंत्रिपदाबाबत पंकजा मुंडे यांनी वक्तव्य केल्याने चर्चा रंगली आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, की मला जालन्याचं पालकमंत्रिपद मिळालं आहे. मला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मला जी संधी मिळते तेव्हा ती संधी मी अनुभव म्हणून घेत असते. कायमच तुम्हाला एकच काम करायला मिळेल असं होत नाही. मी पाच वर्षे कुठल्याच संविधानिक पदावर नव्हते तरीही संघटनेचं काम केलं.
हेही वाचा : खो-खो महिला-पुरुष संघाने विश्व चषक जिंकला!
अजित पवार पालकमंत्री म्हणून चांगलं काम करतील : पंकजा मुंडे
मला बीडचं पालकमंत्री केलं असतं तर बरं झालं असतं कारण मी बीडची कन्या आहे. बीडकरांनाही याचा आनंद झाला असता. माझा पाच वर्षांचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील विकसनशील राहिलेला आहे हे कुणीही मान्य करेल. पण जे निर्णय झाले आहेत त्याबाबत असहमती न दर्शवता जी जबाबदारी मिळाली आहे त्याबाबत चांगलं काम करण्याची भूमिका माझी आहे. अजित पवार हे बीडचे पालकमंत्री म्हणून चांगलं काम करतील याबद्दल मला काहीही शंका नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
मला जालन्याची जबाबदारी देण्यात आली आहे ती मी पार पाडेन. जालन्यावर डबल लक्ष मला द्यावं लागेल. बीडचे पालकमंत्री अजितदादा आहेत, ते आम्हाला पूर्ण सहकार्य करतील असा मला विश्वास आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.





