‘..म्हणून आम्हाला ४०० जागा जिंकायच्या आहेत’; भाजप नेत्याचं विधान
नवी दिल्ली | भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देशभरात ४०० जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. यावरून विरोधकांकडून विरोधक भाजपावर टीका करत आहेत. विरोधकांच्या या आरोपांवर भाजपा नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार हर्ष मल्होत्रा यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.
हेमंता बिस्वा सरमा म्हणाले की, मुघलांनी आपल्या देशाचं जे जे नुकसान केलंय ते आम्ही दुरुस्त करू. देशात अद्याप बरीच साफसफाई बाकी आहे. भाजपाने राम मंदिर उभारण्याचं वचन पूर्ण केलं आहे. त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आमचा मोठा विजय व्हायला हवा. काँग्रेसच्या काळात आपल्याला सांगितलं जायचं की काश्मीर भारतातही आहे आणि पाकिस्तानातही. काश्मीर प्रश्नावर संसदेत कधीच चर्चा होत नव्हती. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे असं कधी संसदेत म्हटलं जात नव्हतं. मात्र अलीकडच्या काळात परिस्थिती बदलली आहे. आता पाकव्याप्त काश्मीरमधील लोकही भारताचा झेंडा फडकवू लागले आहेत. तिथली सध्याची परिस्थिती आणि पंतप्रधान मोदींच्या काश्मीरबाबतच्या भूमिका पाहता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही ४०० जागा जिंकलो तर पाकव्याप्त काश्मीरदेखील भारताचा भाग बनेल.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड शहरात १२०० होर्डिंग; १५ दिवसात होणार होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट
केजरीवाल पूर्वी काँग्रेसवर घराणेशाहीचे आरोप करायचे. मात्र तेच केजरीवाल आता त्यांच्या पत्नीला राजकारणात पुढे आणत आहेत. ते एका आलिशान बंगल्यात राहतात. तसेच ते जे काही बोलतात नेमकं त्याच्या उलट वागतात. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. ते बरे होतील तोवर त्यांची परत तुरुंगात जाण्याची वेळ येईल. दिल्लीतील जनता अंतरिम जामीनावर तुरुंगातून बाहेर अलेल्या दिल्लीच्या भ्रष्टाचारी मुख्यमंत्र्यावर आता विश्वास ठेवणार नाही. भाजपाविरोधात केजरीवाल यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं धोरण नाही. ज्याला राष्ट्राचा विकास करायचा असतो त्याला समोर कोणतंही आव्हान दिसत नाही. तो त्याचं काम नीट करत असतो. आज आपल्या देशातील जनतेलाही वाटतं की, केवळ नरेंद्र मोदी हेच देशाचा विकास करू शकतात, असंही हेमंता बिस्वा सरमा म्हणाले.