भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचं इचलकरंजीबाबत वादग्रस्त विधान; म्हणाले..

Harshvardhan Patil | शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी सलग हातकणंगले मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. याबद्दल धैर्यशील माने यांचे अभिनंदन करताना भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इचलकरंजीबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. इचलकरंजी मतदारसंघ पाकव्याप्त काश्मीर मानला पाहिजे, असं ते म्हणाले. पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सांगली येथे आयोजित सभेत बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, मी सर्वात आधी खासदार धैर्यशील माने यांचं अभिनंदन करतो. सर्वांना विनंती करतो की तुम्ही देखील टाळ्या वाजवून माने यांचं अभिनंदन करायला पाहिजे. कारण इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ हा तसा पाहिला तर पाकव्याप्त काश्मीर मानायला पाहिजे. कारण आजूबाजूला सगळी मोठी वादळं होती. आजूबाजूला सगळ्या शक्ती विरोधात उभ्या ठाकल्या होत्या. काही शक्ती अदृश्य होत्या, तर काही दृश्य स्वरूपाच्या होत्या. या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी येथे विजय मिळवला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत धैर्यशील माने यांनी या वावटाळात (वादळात) दिवा लावला आहे. त्यामुळे मी धैर्यशील माने यांचं मनापासून अभिनंदन करतो.
हेही वाचा – तुम्हाला माहित आहेत का जगातील सर्वात श्रीमंत १० क्रिकेट बोर्ड कोणते?
बरं झालं माने यांनी मला सांगितलं आणि मी विमानाने नाही तर कारने येथे आलो. त्यांनी मला सांगितलं, पुढच्या वेळी इचलकरंजीला येताना ट्रेनने या. त्यानंतर तुम्ही मोटरसायकलवरून या. गरज पडल्यास सायकलवरून या. काल राज्याचे मुख्यमंत्री देखील पंढरपूरला बुलेटवर बसून गेले. राज्याचा नेता असा असायला हवा. राज्याचा नेत जनसामान्यांमध्ये मिसळायला हवा. हीच शिकवण आपल्याला या मातीने दिली आहे. मी किंवा धैर्यशील माने देखील ती शिकवण पाळत आलो आहोत, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.




