Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘पुणे विभागातील कर्करोग रुग्णालयाच्या कामाला तातडीने गती देण्यात येईल’; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पुणे : कर्करोगाची दिवसेंदिवस वाढती रूग्णसंख्या विचारात घेता या रोगाचे अचूक निदान आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळाल्यास प्राण वाचण्यास मदत होते. रुग्णांना जवळच्या रुग्णालयात माफक, अचूक निदान तसेच अत्याधुनिक उपचार उपलब्ध होईल यादृष्टीने राज्य शासन प्रयत्नशील आहे, पुणे विभागातील कर्करोग रुग्णालयाच्या कामाला तातडीने गती देण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

आळंदी येथील इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे पेटसिटी युनिटच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार दिलीप वळसे-पाटील, बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषद पुणेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. नितीन देवमाने, आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्युटचे विश्वस्त डॉ. संजय देशमुख, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, देशात कर्करोग रोगाचे प्रमाण अतिशय वेगाने वाढत असून त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी अचूक निदान आणि योग्यप्रकारे उपचार महत्त्वाचे आहे. उपचार उशिरा सुरु झाल्यास रुग्णांचा वेळ आणि खर्चात वाढ होते; याच बाबीचा विचार करुन केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेमध्ये कर्करोगावरील उपचाराचा समावेश केलेला आहे.

राज्यशासन कर्करोगाविरुद्ध लढ्यासाठी केवळ उपचारावर भर न देता प्रतिबंध आणि अचूक निदानावर विशेष लक्ष देत आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यस्तरीय कर्करोग उपचार व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. महाकेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून कर्करोग उपचार व्यवस्था उभारण्यात येणार आहे. तसेच नागपूर येथे हायएनर्जी मेडिकल सायक्लोस्टोन प्रकल्प स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली, त्यामुळे कर्करोग उपचार, निदान आणि संशोधनाला चालना मिळणार आहे.

हेही वाचा –  ‘युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णालयाला भेट दिली असता रुग्णालय व्यवस्थापनाने अत्याधुनिक पेटसिटी मशीनकरिता निधीची मागणी केली असता, कर्करोगाचे गांभीर्य आणि रुग्णांची गैरसोय विचारात घेता त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या मशीनकरिता २७ कोटी रुपये उपलब्ध करुन दिले. या पेटस्कॅन मशीनच्या माध्यमातून कर्करोगाचे अचूक निदान होण्यासह डॉक्टरांना आधुनिक उपचारपद्धतीचा अवलंब करता येणार आहे. सर्वसामान्य गरजू रुग्णांना या अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा लाभ होणार असून त्यांचे प्राण वाचणार आहेत. इंद्रायणी रुग्णालयाने व्यवसायिक दृष्टिकोन न ठेवता नेहमीच रुग्णांना माफक दरात आरोग्यसेवेला प्राधान्य दिले आहे. हे कार्य सामजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे, यापुढेही अशीच निरंतर रुग्णसेवा होत राहील, या कार्याला राज्य शासनाकडून सहकार्य कऱण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या.

श्री. वळसे पाटील म्हणाले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे पेटस्कॅन मशीन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या  कर्करोग रुग्णालयात आर्थिकदृष्टया दुर्बल, सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात उपचार मिळत आहे, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी राहण्याची व्यवस्थेची सुविधा आवश्यक आहे, राज्य शासनासोबत  सेवाभावी संस्थानी मिळून हे काम करावे, आज दिवसेदिवस कर्करोगाचे प्रमाणात वाढ होत असून कर्करोगा विरुद्ध लढण्याची आपली सामजिक जबाबदारी आहे. येत्या काळात जिल्ह्यात कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी सुसज्ज कर्करोग रुग्णालयांची उभारणी होणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचीही गरज आहे, असे वळसे पाटील म्हणाले.

श्री. काळे म्हणाले, सामजिक बांधिलकी जपत आळंदी येथील इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आळंदी, खेड परिसरासह विविध भागातील रुग्णांना कर्करोगावर उपचार होत आहे, यापूढेही  रुग्णसेवेच्या माध्यमातून कर्करोगमुक्त परिसर होण्यास मदत होईल.

माजी आमदार मोहिते पाटील आणि डॉ. देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी कर्करोग रुग्णालयाची पाहणी करुन येथील सर्व सुविधांची माहिती घेतली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button