महापौरांच्या खुर्चीवर बसण्याआधीच संजय राऊतांची रितू तावडेंवर टीका; म्हणाले, “फक्त त्यांनी एक करावं…”

मुंबई : मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपाने रितू तावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ११ फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत त्या बिनविरोध निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. दरम्यान, उमेदवारी जाहीर होताच त्यांनी मुंबईतून बांगलादेशींना हाकलून लावण्याचे आश्वासन मुंबईकरांना दिलंय. यावरून संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका केली.
मला इथं प्रत्येक मुंबईकरासाठी काम करायचं आहे. जर मुंबईकरांची इच्छा आहे की त्यांना चालायला फुटपाथ नाही तर त्यांच्या मनात यावरुन रोष आहे. मुंबईकर हे टॅक्स पेअर आहे. मुंबईकर अलर्ट आहेत, शिक्षित आहेत, संवेदनशील आहेत. त्यांना असं वाटतंय की, आम्हाला रस्त्यावरुन चालायचंय पण आम्हाला रस्ताच उपलब्ध नाही. मग या रस्त्यांवर कोणी अतिक्रमणं केली आहेत, तर बांगलादेशी रोहिंग्यांनी! त्यामुळं जर मुंबईला आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्याला या लोकांना इथून बाहेर काढावं लागेल आणि ही आमची प्राथमिकता आहे, असं रितू तावडे म्हणाल्या.
रितू तावडे यांच्या या विधानावर आता संजय राऊतांनीही पलटवार केला आहे. संजय राऊत एक्स पोस्टमध्ये म्हणाले, “मुंबईच्या होणाऱ्या महापौर ऋतू तावडे यांनी मुंबईतून बांगलादेशींना घालण्याची घोषणा केली! छान.”
“फक्त त्यांनी एक करावे पंतप्रधान मोदी यांना दिल्लीत जाऊन विचारावे की कालच्या अर्थसंकल्पात बांगलादेशला कोट्यावधी रुपयांचे दान का दिले? बंगला देशातील हिदू मंदिरांवर हल्ले करण्यासाठी आणि हिंदूंच्या कत्तली करण्यासाठी हे दान दिले काय?” असा थेट सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.




