एपस्टीन फाईल्स प्रकरणात मोदींचं नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांवर एकनाथ शिंदे म्हणाले की, हा…

Eknath Shinde : “जेव्हा लोक दुर्लक्षित होतात. लोकांचं त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. त्यावेळी असं काहीतरी सनसनाटी बातम्या पसरवायच्या. चर्चेमध्ये राहण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून देशासाठी केलेलं काम सर्वश्रृत आहे” अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेने काँग्रेसला धक्का दिला. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि पुणे महापालिकेचे माजी उप महापौर आबा ऊर्फ उल्हास बागुल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. “एनडीएचे घटक म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आज आपला देश पुढे जातोय. विकसित होतोय. देशाची आर्थिक महासत्तेकडे वाटचाल सुरु आहे. 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचा प्रयत्न आहे. पाचव्या नंबरवर अर्थव्यवस्था आहे. तिसऱ्या नंबरवर जाण्याचा प्रयत्न आहे. ही जी काही पोटदुखी आहे, जळजळ आहे ही त्यांच्या वक्तव्यातून दिसते” असं एकनाथ शिंदे म्हणाले. ते पृथ्वीराज चव्हाणांबद्दल बोलत होते.
“लोकप्रियतेच्या शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातच नाही, तर जगात आहेत.एखाद्या लोकप्रिय व्यक्तीवर आरोप केले की त्याची गंभीर दखल घेतली जाते. हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. म्हणून याची निंदा करावी तेवढी कमी आहे. राहुल गांधी विदेशात जाऊन देशाची बदनामी करतात” असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला. “आपल्या लष्कराची बदनामी करतात. पाकिस्तानच म्हणणं खरं मानतात. एक तास आपण युद्धात हरल होतो, असं म्हणण्यात त्यांना आनंद वाटतो. ही कसली देशभक्ती आहे? हा देशद्रोह आहे? देशाशी बेईमानी आहे. त्यांचं पाकिस्तान प्रेम उतु चाललं आहे. म्हणून देशातील जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही” अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
हेही वाचा – ‘दृष्टिबाधित खेळाडूंना राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्यात येणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केलेला की 19 डिसेंबरला पंतप्रधान बदली होतील. आता ते म्हणतात की एपस्टीन फाइल्स आणि मोदी यांचे काय संबंध होते? ते सरकारने उलगडून सांगावं. त्यांची भाषा बदलली आहे. यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही. चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पंतप्रधानांबद्दल काहीही बोलून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसून येतो. तुम्ही लष्कराच्या शौर्यावर संशय व्यक्त करता,ही कसली देशभक्ती, तुम्ही जेवढे मोदींवर आरोप कराल, तेवढी देशातील जनता त्यांच्यासोबत राहील”





