‘गेल्या १५ वर्षांत मतदार संघामध्ये विकास झाला नाही’; डॉ. अर्चना पाटील चाकूरकर
मिशन विधानसभा : काँग्रेसचे अमित देशमुख यांच्यावर हल्लाबोल

लातूर | लातूर शहर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होत आहे. या ठिकाणी भाजपकडून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदार अमित देशमुख हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यातच कमी कालावधी असताना देखील अर्चना पाटील चाकूरकर यांनी प्रचारात मोठे आखाडी घेतली आहे. यातच मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षात कोणताही विकास झालेला नाही. त्यामुळे यंदा मला काम करण्याची मोठी संधी आहे, असे म्हणत अर्चना पाटील चाकूरकर यांनी अमित देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मतदारसंघात प्रचार करत असतांना अनेक भागात फिरत आहे. लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. परंतु ज्या ज्या भागात जात आहे, त्या त्या भागातून अनेक विकास कामांच्या मागण्या केल्या जात आहेत. अशातच मागच्या काही वर्षांपासून लातुरकरांचा आणि विद्यमान आमदारांचा संबंध संपला होता. याठिकाणी मी भाषण करण्याऐवजी संभाषणावर भर देत आहे. त्यात मला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत आहे असा टोला देखील अर्चना पाटील चाकूरकर यांनी लगावला आहे.
हेही वाचा – इतिहासाची पुनरावृत्ती होणार..! लातूर शहराला नवा आमदार मिळणार?
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रातील एकमेव असा जिल्हा आहे. ज्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांसाठी जिल्हा रुग्णालय नाही. सरकारी दवाखाना नाही. हा महत्त्वाचा मुद्दा लोकांच्या आयुष्याशी सध्या निगडित आहे. मतदारसंघातील ज्या ज्या भागात मी फिरत आहेत. त्या त्या भागातील नागरिकांच्या मागण्या या वाढत जात आहेत. अनेक ठिकाणी प्रश्न अनेक आहेत. त्यामुळे लोकांनी मला काम करण्यासाठी मोठी संधी दिली आहे.
दलित नेतृत्वाला न उमेदवारी देता एका लिंगायत चेहरा म्हणून मला आऊट ऑफ ट्रॅक जाऊन उमेदवारी दिली गेली आहे. दलित समाजाच्या रोषाची परवा केली आहे म्हणजे याचा अर्थ दलित समाजाचे मतदान हे गृहीत धरले गेले आहे. त्याच्यामध्ये दलित समाजामध्ये प्रचंड आक्रोश मतदान रुपी तुम्हाला दिसेल. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. लढत ही अतिशय रंगतदार होत आहे. परंतु शेवटच्या दोन-तीन दिवसांमध्ये लातूरकरांच्या भोवती काय तंत्र वापरले जाते. ते तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. असेही त्या म्हणाल्या.





