ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने झालेले खून, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरुन देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप

मुंबई : मुंबईत सोमवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये पाऊस सुरु असतानाच घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून सोमवारी मोठी दुर्घटना घडली. घाटकोपरच्या पोलीस मैदानावरील पेट्रोल पंपावर 250 टन वजनाचे होर्डिंग वादळामुळे कोसळलं. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान, होर्डिंग कोसळल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. दरम्यान घाटकोपरच्या या होर्डिंग दुर्घटनेवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्या दिवशी होर्डिंग पडलं आणि निष्पाप लोकांचा जीव गेला. त्यादिवशी मी ठरवलं होतं की, या होर्डिंगचा मालक कोणत्याही बिळात लपला असला तरी शोधून काढेन. आज आम्ही त्याचा मालक शोधून काढलाय. त्यांचा पर्दाफाश झालेला आहे. सर्व बेकायदेशीर परवानग्या उद्धव ठाकरेंच्या सरकारने दिलेल्या आहेत. बंधू-भगिनींनो 140/120 चे होर्डिंग होतं. कोणतेही नियम नाही. कोणत्याही परवानग्या नाहीत. थेट तुम्ही लावलं आणि त्याला तुम्ही लीज देता. त्याला तुम्ही सर्व मान्यता देता. आज खऱ्या अर्थाने हा अपघात नाही. एकप्रकारे या लोकांचा खून झालाय. तो त्यावेळेसच्या सरकारच्या आशीर्वादाने झालाय.
हेही वाचा – राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान काय? शरद पवारांचा खोचक टोला
मी तुम्हाला शब्द देतो, कोणत्याही परिस्थितीत हे जे 16 लोक गेलेत. यांचं जीवन वाया जाऊ देणार नाही. अपघात म्हणून मी त्याला सुटू देणार नाही. आम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही सिद्ध करु. त्याला त्याची शिक्षा भोगावी लागेल. लोकांचं जीवन उद्धव ठाकरेंना स्वस्त वाटत असेल. आम्हाला वाटत नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
घाटकोपरमध्ये बेकायदेशीर बॅनर उभारुन 17 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपी भावेश भिंडेला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी जयपूरमधून त्याला ताब्यात घतेलं आहे. घाटकोपर दुर्घटनेवरुन राजकारण तापलं असता, पोलीस प्रशासन गंभीर होताच, याप्रकरणातील आरोपी भावेश भिंडे बेपत्ता झाला होता. भावेश भिंडेच्या मागावर मुंबई पोलिसांची 7 पथकं कार्यरत होती.





