‘जितेंद्र आव्हाडांचं हे विधान अतिशय आक्षेपार्ह’; देवेंद्र फडणवीस संतापले
![Devendra Fadnavis said that this statement of Jitendra Awada is very offensive](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/jitendra-awhad-and-devendra-fadnavis-780x470.jpg)
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुका निघतात त्यामध्ये दंगली होतात असे विधान केले होते. यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते विधान अतिशय आक्षेपार्ह आहे. रामनवमी असेल किंवा हनुमान जयंती असेल ही अत्यंत शांततेने साजरी केली जाते. लोकांच्या मनात प्रभु श्रीराम आणि हनुमंताच्या प्रती प्रचंड श्रद्धा आहे. ती श्रद्धा त्या निमित्ताने व्यक्त केली जाते. त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य करणे चुकीचे आहे. हा रामभक्तांचा अपमान आहे. समस्त समाजाचा अपमान आहे.
महाराष्ट्रात भविष्यात दंगली होतील असं वक्तव्य करणं याचा अर्थ काय घ्यायचा? म्हणजे तुम्ही असे काही ठरवले आहे का की दंगली घडवायच्या? असा त्याचा अर्थ आहे का? किमान नेत्यांनी संवेदनशीलतेने वागले पाहिजे. सनसनाटी प्रत्येक ठिकाणी निर्माण करणे योग्य नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे. जर हिंदू धर्माचा त्यांनी सातत्याने अपमान सुरूच ठेवला तर जितेंद्र आव्हाड जिथे दिसतील तिथे त्यांचे चप्पलेने स्वागत केलं पाहिजे, असं वक्तव्य भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी केलं आहे.