लाडकी बहीण व शेतकऱ्यांच्या योजना कधीही बंद होणार नाहीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | लाडकी बहिण योजना, शेतीला मोफत विज, पिक विमा, तसेच शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय सरकार कधीच बंद करणार नाही. आम्ही निवडणुका जिंकण्यापुरते आश्वासन देणारे लोक नाही तर आम्ही लोकांसोबत राहून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे लोक आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगाव येथील प्रचारसभेत बोलताना केले. ते कोपरगाव नगरपालिका निवडणुकीतील भाजप-रिपाइं युतीच्या प्रचारसभेत बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात आम्हाला मोठा विजय मिळाला नंतर विरोधक सांगायचे यांनी सुरु केलेल्या योजना बंद होणार परंतु विरोधकांच्या नाकावर टिच्चून एक वर्ष झाले तरी सर्व योजनांचे पैसे सुरू आहेत. बहिणींनो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत तुमचे पैसे कोणीच बंद करू शकत नाही. शेतकऱ्यांच्या सर्व योजना सुरू आहेत. महाराष्ट्राच्या नागरी भागाला कशा प्रकारे विकसित करायचे याचा कृती आराखडा राज्य सरकारने तयार केला आहे, त्यासाठी केंद्राचा मोठा निधी मिळणार आहे. अमृत पेयजल योजनेच्या माध्यमातून राज्यात ३० हजार कोटींच्या योजना पूर्ण झाल्याने त्या शहरातील लोकांना वर्षे भर मुबलक पिण्याचे पाणी मिळत आहे. दुसऱ्या टप्प्यात या योजनेला केंद्राकडून ५० हजार कोटी रुपये उपलब्ध होणार आहे. मी निवडणुकीत मतदान मागायला आलो, मी कोणावरही टिका करणार नाही. कुणाच्या विरोधातही बोलणार नाही.
हेही वाचा : “तिजोरी तुमच्याकडे, पण तिचा मालक आमच्याकडे”; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना पलटवार
शहरात उघड्यावर गटारी न ठेवता, भुयारी गटारी करून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारुन शुद्ध पाणी जमिनीत जाण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यासोबतच अतिक्रमण नियमित करून फक्त थांबणार नाही, तर अडीच लाख रुपये देऊन पक्के घर देण्याची योजना पूर्ण करणार आहोत. महात्मा जनआरोग्य योजनेत आजारांची संख्या २४०० पर्यंत वाढवून ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुरू आहेत. मागील वेळेसारखी चूक न करता,यावेळी भाजपचे अख्खे मंडळ आणि नगराध्यक्ष असे पूर्ण पॅनल निवडून द्या, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.




