‘आपण जरांगेंचं ऐकायला पाहिजे’; छगन भुजबळांचा खोचक टोला
![Chhagan Bhujbal said that we should listen to Jarange](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Chhagan-Bhujbal-1-3-780x470.jpg)
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला २४ डिसेंबरचा अल्टीमेटम दिला आहे. यादरम्यान, आईला ओबीसी आरक्षण असेल तर मुलाल देखील ते मिळालं पाहिजे अशी नवीन मागणी जरांगे यांनी केली. काल सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांच्याशी संवाद साधत होते. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. यावर मंत्री छगन भुजबळांनी जरांगे पाटलांवर जोरदार हल्ला चढवला.
छगन भुजबळ म्हणाले, माझी भूमिका अशी आहे की, आपण जरांगेचे ऐकलं पाहीजे. नाहीतर ते मोर्चा घेऊन येतील. आणखी काहीतरी करतील. त्यामुळे आपण व्याहींचे व्याही, त्यांचे व्याही यांना ताबडतोब आरक्षण दिलं पाहीजे. माझं तर म्हणणं आहे की, मंत्री महोदय सारखे सारखे त्यांना भेटायला अंतरवाली सराटी येथे जात आहेत. ते फार अडचणीचं होतं. त्यामुळे तिथे दोन-चार सरकारी बंगले बांधले पाहीजेत. मुख्य सचिवांचे एक कार्यालय तिथे स्थापन केले पाहीजे. जरांगेंनी सांगितल्यानंतर मंत्र्यांनी ऑर्डर काढून मुख्य सचिवांनी त्याला तात्काळ मंजुरी देऊन टाकावी. तसेच माजी न्यायाधीशांच्या समितीचेही कार्यालय तिथे थाटावे, म्हणजे जरांगे म्हणतात त्याप्रमाणे अहवाल तयार करता येईल.
हेही वाचा – नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दारू दुकाने पहाटेपर्यंत सुरू
जरांगे पाटील यांच्या मागण्या तर्काला धरून आहेत, नियमाला धरून आहेत. सरकारच त्यांचे काही ऐकत नाही, असे चित्र निर्माण झालेले दिसते. जरांगेच्या मागण्या तात्काळ मान्य केल्या पाहीजेत. जरांगेनी सरकारला वेठीस धरले आहे, असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता भुजबळ म्हणाले की, जरांगेनी सरकारला वेठीस धरलेले नाही तर सरकारनेच जरांगेना वेठीस धरले आहे. तसेच मी याआधी केलेली माझी सर्व भाषणे मागे घेत असून जरांगेच्या अभिनव कल्पनांना मान्यता देत आहे. कायदे बदलून टाकावेत. पुढच्या मेळाव्यात मी त्यांच्याबाजूने भाषणे करणार आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.
देव जरी आडवा आला तरी मराठा आरक्षण घेणारच, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. यावरून छगन भुजबळ म्हणाले, ते देवालाही घाबरत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासमोर सरकार काय करणार? असा टोलाही छगन भुजबळांनी लगावला.