‘जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना’; छगन भुजबळ यांचं सूचक विधान

Chhagan Bhujbal | महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबर रोजी नागपूरमध्ये पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक नव्या चेहर्याना संधी देण्यात आली. मात्र, या मंत्रिमंडळातून काही दिग्गज नेत्यांना डावलण्यात आलं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे त्यांनी आपली जाहीर नाराजी बोलून दाखवली आहे. तसेच, मी आता अधिवेशनाला जाणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
छगन भुजबळ म्हणाले, की उद्या मी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. येवला आणि लासलगावमध्ये जाणार आहे. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. तसेच समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनाही भेटणार आहे. याबरोबरच नाशिकसह चार जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. त्यानंतर पुढील भूमिका काय ते ठरवणार आहे. कार्यकर्ते नाराज आहेत, यावर मी त्यांना काय भूमिका घ्यायची हे उद्या विचारणार आहे.
हेही वाचा – बीड, परभणीच्या घटना गंभीर; सरकारची सविस्तर चर्चेची तयारी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मी माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. तसेच समता परिषदेशी आणि अनेक कार्यकर्त्यांशीही चर्चा करणार आहे. त्यानंतर पुढे काय करायचं ते मी ठरवणार आहे. मात्र, एक आहे की जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना, असं सूचक विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे.
दरम्यान, छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यात येणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ नेमकं काय भूमिका घेतात? याकडे अनेकाचं लक्ष लागलं आहे.





