उपेक्षित ,वंचित घटकाला न्याय मिळवून द्या : खासदार रामदास आठवले
ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांचा पुणेकर आंबेडकरी चळवळी च्या वतीने विशेष सन्मान समारंभ
पुणे: समाजातील उपेक्षित ,वंचित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे ,त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम सर्वांनी मिळून केले पाहिजे ,यातूनच भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली मिळेल असे मत केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केले . छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव बोपोडी येथे आयोजित करण्यात आला होता .त्याप्रसंगी आठवले बोलत होते .
पुढे ते म्हणाले की ,शरणकुमार लिंबाळे यांचा आज पुणेकर आंबेडकरी चळवळीच्या वतीने विशेष सन्मान होत आहे याचा आपल्याला आनंद होत आहे .लिंबाळे यांचे साहित्य हे दलीत चळवळीला दिशा देणारे आहे .त्यांनी दलीत साहित्यात अतिशय मोलाचे योगदान दिले आहे .तसेच त्यांना देशातील सर्वोच्च असा सरस्वती सन्मान पुरस्कार मिळाला ही अतिशय अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे .असे सांगून त्यांनी लिंबाळे यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले .
ज्येष्ठ साहित्यिक शरकुमार लिंबाळे आपल्या मनोगतात म्हणाले की ,आज माझा आंबेडकरी चळवळीच्या वतीने इतका मोठा सन्मान हा प्रथमच होत आहे .त्यामुळे मला याचा आनंद होत आहे .आठवले यांनी आम्हाला नेहमीच प्रेरणा आणि मार्गदर्शन करीत आमच्या पाठीशी उभे राहिले .त्यामुळे आम्हाला कायम त्यांची मदत मिळते .आजच्या सन्मा ना बद्दल त्यांनी संयोजकांचे आभार मानले .
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष व या महोत्सवाचे मुख्य संयोजक परशुराम वाडेकर यांनी प्रास्ताविकात या महोत्सव समितीच्या कार्याचा आढावा सांगितला.तसेच या महोत्सवात सर्व पुणेकर नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले .
या प्रसंगी आमदार सिध्दार्थ शिरोळे ,माजी उपमहापौर सुनीता वाडेकर ,संयोजक परशुराम वाडेकर ,माजी नगरसेवक आनंद छाजेड, रिपबलिकन पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश चव्हाण ,असित गांगुर्डे यासह विवध पक्ष संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .
हा महोत्सव अजून तीन दिवस चालणार आहे .