‘आम्ही भाजपा परिवार’ म्हणणाऱ्या भाजपाला टिळक परिवाराचा जाणीवपूर्वक विसर?
![BJP who says 'We are BJP Parivar' deliberately forget Tilak Parivar?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Sharad-Pawar-780x470.jpg)
अखेरपर्यंत पक्षाच्या सच्च्या मुक्ता टिळक यांना हीच भाजपाची श्रद्धांजली म्हणावी का?
पुणे : वेळ आहे उमेदवार बदलता येईल असं सूचक वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. या पार्श्वभूमीवर ‘आम्ही भाजपा परिवार’ म्हणणाऱ्या भाजपाला टिळक परिवाराचा जाणीवपूर्वक विसर?, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसने लगावला आहे.
निवडणुकांपेक्षा मानवी भावना आणि कार्यकर्त्यांचा सन्मान महत्त्वाचा असतो. मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभेसाठी टिळक परिवाराला डावलून, हेमंत रासने यांना उमेदवारी देऊन, भाजपाने या दोहोंचा अवमान केला आहे. अखेरपर्यंत भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्या राहिलेल्या मुक्ता टिळक यांच्या निष्ठेचे हेच फळ भाजपाला त्यांच्या परिवाराला द्यावेसे वाटले का? हा प्रश्न इथे सर्वात महत्त्वाचा आहे.
दुर्धर आजारपणातही पक्षाला माझी गरज आहे, मी मतदानाला जाणार, असे म्हणत मुक्ताताईंनी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करून पक्षासाठी मोलाचे योगदान दिले होते. अशा सच्च्या आणि निष्ठावान पक्ष कार्यकर्त्या असलेल्या मुक्ताताईंना अशाप्रकारे भाजपा श्रद्धांजली वाहत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे.
आज पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना हेमंत रासने यांच्यासाठी मोठे शक्तीप्रदर्शन भाजपाने केले. हीच ताकद भाजपाला टिळक कुटुंबीयांच्या पाठीशी उभी करता आली नसती का? ज्यांनी पक्षासाठी आयुष्य वेचले त्यांना बळ द्यायचे सोडून फक्त निवडणुकीतील फायदा भाजपा बघत आहे, याचा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच रोष पाहायला मिळत आहे. तरीही निवडणूक बिनविरोध केल्यास टिळक परिवाराला उमेदवारी देण्याची तयारी असल्याची मुक्ताफळं भाजपा प्रदेशाध्यक्ष उधळत आहेत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अटी शर्थी लावून टिळक परिवाराला वाऱ्यावर सोडायचे काम भाजपा करत असल्याचे उघड आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हटलं आहे.