आमदार बच्चू कडू यांचा शिंदे सरकारला सूचक इशारा; म्हणाले..

मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. सोबतच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता शिंदे गट आणि भाजपमधील आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीसांना सूचक इशारा दिला आहे.
आमदार बच्चू कडू म्हणाले की, आम्ही शिंदे सरकारसोबत आहोत. एकनाथ शिंदे यांच्यामुळेच आम्ही उद्धव ठाकरे यांना सोडलं. आता एकनाथ शिंदे भाजपसोबत जाणार हे माहीत नव्हतं. पण ते गेले. आमची गोची व्हायचं कारण नाही. कारण आमचा स्वतंत्र पक्ष आहे. सगळ्यात मोठी उपलब्धी आहे की, दिव्यांग मंत्रालय सुरू झालं. एक मोठं काम झालं. देशातील पहिलं असं मंत्रालय झालं म्हणून गोची व्हायचं कारण नाही.
हेही वाचा – ‘राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट ही शरद पवारांचीच खेळी..’; पवारांच्या सहकाऱ्याचा दावा
काही गोष्टी नकारात्मक घडल्या असल्या तरी त्यातून सकारात्मक पाहायचं आहे. दिव्यांग मंत्रालय सुरू झालंय. यातच आमचा आनंद आहे. मी गेले १५ वर्षे दिव्यांगासाठी काम करतोय. माझ्याविरोधात ३०० ते ३५० गुन्हे दाखल झाले. हे सगळं करत असताना कित्येकदा जेलमध्ये गेलो. दिव्यांगासाठी ८१ शासन निर्णय काढले. मी दिव्यांग मंत्रालयाचा अध्यक्ष आहे, असं बच्चू कडू म्हणाले.
मी नाराज व्हायचं काही कारण नाही. कारण मला या सरकारमध्ये दिव्यांग मंत्रालय मिळालं आहे. मी नाराज होत नाही. नाराज झालो तर वाटोळं केल्याशिवाय राहत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. लोकं मंत्रिपद मागत होते. आम्ही मंत्रालय केलं. याचे अनेक मंत्री होतील. यात नाराजीचं काही कारण नाही. पण एकंदरीत जे वातावरण चाललंय. राष्ट्रवादीने आमचा घात केला. राष्ट्रवादीमुळे आम्ही शिवसेना सोडून नवीन गट तयार केला. आता राष्ट्रवादी सरकारमध्ये सामील झाल्याने आमदारांमध्ये नाराजीचा सूर आहे, तो आम्ही बोलून दाखवला आहे. त्यांची मोठी गोची झाली आहे. आमदारांना आपण सांगत होतो की, राष्ट्रवादीने आम्हाला निधी दिला नाही, कमी करण्याचा प्रयत्न केला. तीच राष्ट्रवादी आता सरकारमध्ये आहे. तीच अडचण निर्माण होतेय आणि नाराजीचा सूर आहे, असंही बच्चू कडू म्हणाले.





