‘दोन्ही विरोधी पक्षनेते महायुतीत सामील होतील’; भाजप नेत्याचा मोठा दावा
मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील अनेक नेते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. यावरून भाजप नेते आशिष देशमुख यांनी मोठा दावा केला आहे. येत्या काळात राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते भाजपा किंवा भाजपा संलग्न पक्षात सामील होतील, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.
आशिष देशमुख म्हणाले की, मागच्या दहा वर्षांत जे जे कोणी विरोधी पक्षनेते होते, त्यांनी भाजपा किंवा भाजपा संलग्नित होऊन राजकारण करण्याचं ठरवलं आहे. येणाऱ्या काही दिवसांत महाराष्ट्रातील दोन्ही विरोधी पक्षनेते भाजपामध्ये आणि महायुतीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
हेही वाचा – इंडिया आघाडीतल्या मतभेदांवर शरद पवार यांचं मोठं विधान; म्हणाले..
सुरूवातीच्या काळात २०१४ साली एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते होते, ते भाजपात आले. काही कालावधीसाठी अजित दादा विरोधी पक्षनेते होते. तेही महायुतीत आले. ही श्रृंखला पुढे चालेल, असं आशिष देशमुख म्हणाले.
दरम्यान, सध्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे आहेत. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ठाकरे गटाचे अंबादास दानवे हे आहेत. त्यामुळे वडेट्टीवार आणि दानवे महायुतीत सामील होणार का? हे पहावं लागणार आहे.