‘बाबासाहेब पुरंदरे नसते तर शिवाजी महाराजांची ओळख तितक्या मोठ्या प्रमाणात देशभर नसती’; अमित शहा

शिवसृष्टीचा प्रकल्प ४३८ कोटींचा आहे, याचा पहिला टप्पा सुरू
पुणे : बाबासाहेब पुरंदरे यांनी आपलं सगळं आयुष्य छत्रपती शिवराय या एका विषयावर खर्ची घातलं. संपूर्ण देश फिरून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत त्याची माहिती घेतली आणि जनतेलाही त्याची ओळख करून दिली. देशाच्या कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र पोचविण्याचे काम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे समर्पित भावनेने केले. पुरंदरे यांनी हे काम नसते, तर शिवाजी महाराज यांची ओळख तितक्या मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोचली नसती, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांनी जाणता राजा हा प्रयोग केला होता. त्यावेळी मी गुजरातमध्ये होतो गुजरातमध्ये आम्ही ८ जिल्ह्यात जाणता राजाचे प्रयोग केले. छत्रपती शिवाजी महाराज की जय हे नारे कुणीही न सांगता लागत असत. आज बाबासाहेब पुरंदरे ह्यात नाहीत पण त्यांचं स्वप्न साकार होतं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवसृष्टीचं राहिलेलं कामही लवकरच पूर्ण होईल, असाही विश्वास अमित शाहा यांनी व्यक्त केला.
शिवसृष्टीचा प्रकल्प ४३८ कोटींचा आहे. याचा पहिला टप्पा सुरू होतो आहे. चार टप्पेही दिलेल्या वेळात पूर्ण होतील याचा मला विश्वास आहे. पहिल्या टप्प्यात शिवकालीन इतिहासातले अनेक प्रसंग आहेत. आग्र्याहून सुटका, शिव राज्याभिषेक यासारखे अनेक प्रसंग या ठिकाणी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सगळं लिखाण वाचणं शक्य नाही. पण इथे जी व्यक्ती येईल त्या व्यक्तीला शिवाजी महाराज कळतील याविषयी माझ्या मनात शंका नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास यांचे विचार हे लोकांना समजणं खूप आवश्यक आहे. तेच काम या माध्यमातून होईल मला विश्वास आहे.
थ्रीडी आणि फोरडी तंत्रज्ञान वापरून आणि इतिहास जिवंत करण्याचा उत्तम प्रयत्न या ठिकाणी झाला आहे. जगभरातल्या इतिहासप्रेमींसाठी, शिवप्रेमींसाठी हे ठिकाण महत्वाचं असणार आहे. फक्त विचार करून बघा छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं? जर तर चालत नसतं. पण यशवंतराव चव्हाण यांचं एक वाक्य सांगतो ते म्हणाले होते की, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानची सीमारेषा शोधण्यासाठी लांब जावं लागलं नसतं आपल्या घराबाहेरच ती सीमा सापडली असती, मला हे वाक्य सांगायचं कारण नाही पण मला छत्रपती शिवरायांचं महत्व काय आहे ते सांगण्यासाठी मी हे वाक्य सांगितलं असंही अमित शाह यांनी म्हटलं.





