‘सामना अजून संपलेला नाही, कोण कोणाची विकेट घेतं हे निवडणुकीत कळेल’; ठाकरे गटाचे मुख्यमंत्री शिंदेंना प्रत्युत्तर

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल टी-२० विश्वचषकात विजय मिळवलेल्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या विधानसभवनातील सत्कार सोहळ्यात बोलताना उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली होती. आमच्या ५० जणांच्या टीमने दोन वर्षापूर्वी काढलेली विकेट कुणीही विसरू शकणार नाही. दोन वर्षांपासून आम्ही सर्व बॅटिंग करत आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावर आता ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
अंबादास दानवे म्हणाले, सामना संपलेला नाही. विधानसभेची निवडणूक पूर्ण होईल, त्या दिवशी सामना संपेल. मग त्या दिवशी कळेल की कोणी कोणाची विकेट घेतली. कोणी कोणाला निवृत्त करायला भाग पाडलं. कोणाला जनतेनं नाकारलं. मला असं वाटतं की, विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागतील त्या दिवशी सर्व चित्र स्पष्ट होईल.
हेही वाचा – पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
माझ्या आधी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चांगलीच बॅटिंग केली. आमचं राजकारण क्रिकेटसारखंच आहे. यातही कुणी, कुठे, कशी विकेट घेईल काही सांगता येत नाही. जसं सूर्यकुमारचा कॅच कुणी विसरू शकत नाही, तसं आमच्या ५० जणांच्या टीमने दोन वर्षापूर्वी काढलेली विकेट कुणीही विसरू शकणार नाही. दोन वर्षांपासून आम्ही सर्व बॅटिंग करतोय. क्रिकेटपासून लोकांना जो आनंद मिळतो, तसाच आनंद राज्यातील जनतेच्या चेहऱ्यावर खुलावा, असा आमचा प्रयत्न आहे. क्रिकेट हा खेळ कुठल्याही जाती-धर्माचा नाही. आमच्या राजकीय क्षेत्रात मात्र कोण कधी कुणाला बाद करेल, कुणाला रन आऊट करेल, हे सांगता येत नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.





