..तर मी राजीनामा देतो; सभागृहातील गोंधळानंतर अंबादास दानवेंचं विधान

मुंबई | विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सोमवारी (१ जुलै) विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका आणि शिवीगाळ केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडून करण्यात येत आहे. तसेच, अंबादास दानवेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे. यावर आता अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली.
अंबादास दानवे म्हणाले, त्यांनी (प्रसाद लाड) सभापतींशी बोललं पाहिजे. माझ्याशी बोलण्याचा काही संबंध नाही. कारण मी त्यांना नाही तर सभापतींना प्रश्न विचारला होता. त्यांनी माझ्याकडे हातवारे करून व्यक्तिगत विरोधीपक्ष नेत्यांनी हे करा, ते करा, अशा पद्धतीने ते बोलत होते. प्रसाद लाड हे कोण आहेत? ते हिंदुत्ववादी आहेत का? ते मला हिंदुत्व शिकवणार का? माझ्यावर हिंदुत्वाचे ७० ते ८० गुन्हे आहेत. हे लोक मला हिंदुत्व शिकवणार का? त्यामुळे माझ्यामधील शिवसैनिक जागा झाला.
हेही वाचा – मुंबईवर पुन्हा ठाकरेंचं वर्चस्व, शिक्षक आणि पदवीधर दोन्ही जागांवर कोरलं नाव
मग मी डायसवरून बाजूला होऊन बोललो. समोर असते तर हातापायी झाली असती. कारण ते व्यक्तिगत घेत होते, तर मलाही व्यक्तिगत घेतलं पाहिजे ना? काय बोलावं आणि काय नाही, ते काय माझे मालक आहेत का? मला त्यांनी निवडून दिलं का? माझा राजीनामा माझ्या पक्षाचे नेते पाहतील. हे कोण आहेत माझा राजीनामा विचारणारे. राजीनामा द्यावा असं ते बोलले. मग तेही मला बोलले आहेत. त्यांनीही राजीनामा द्यावा. ते राजीनामा देत असतील तर मी देखील राजीनामा देतो, असं अंबादास दानवे म्हणाले.





