‘आम्ही विकासांची पंचसूत्री आणली होती, यांनी विकासाचं पंचामृत आणलं’; अजित पवारांचा अर्थसंकल्पावरून हल्लाबोल

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मोठ्या घोषणा केल्या आहेत. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
१४ मार्चला सुप्रिम कोर्टातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीनंतर हे सरकार पडणार आहे, हे त्यांना कळले म्हणूनच योजनांची खैरात केली. हे बजेट चुनावी जुमला आहे, असं विरोधीपक्ष नेते अजित पवार म्हणाले.
सरकारनं गेल्या ८-९ महिन्यात केलेल्या घोषणांचीच पुनरावृत्ती या अर्थसंकल्पात केली आहे. गेल्या अर्थसंकल्पात आम्ही विकासांची पंचसूत्री आणली होती. यांनी विकासाचं पंचामृत आणलं आहे. अमृताप्रमाणेच विकासाचं पंचामृतही कुठे दिसणार नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
आज मी सकाळचे आकडे घेतले. आपल्या डीपीसीचा खर्च फक्त ३५ टक्के झालाय. या महिन्यातले २१-२२ दिवसच राहिलेत. काही जिल्ह्यात तर ४ आणि ५ टक्के खर्च झालाय, असं अजित पवार म्हणाले.
अर्थसंकल्पात निधी फक्त ५१ टक्के झालाय. अजून २० दिवसांमध्ये फारतर २० टक्के खर्च होईल. तरी ३० टक्के खर्च होणारच नाहीये. त्यामुळे फक्त घोषणा करायच्या अशी ही परिस्थिती आहे. जनतेला स्वप्नांच्या दुनियेत फिरवून आणण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला, असंही अजित पवार म्हणाले.





