महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला काय? अजित पवार म्हणाले..

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीरडून विजयाचा दावा केला जात आहे. मात्र, महाविकास आघाडी किंवा महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप समोर आलेला नाही. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारलं असता त्यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. ते नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. आजपासून आम्ही जास्तीत जास्त मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न करत आहोत. महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना महत्वाच्या योजना अर्थसंकल्पात आम्ही सादर केलेल्या आहेत. त्याबद्दलची माहिती आम्हाला शेतकऱ्यांना बहिणींना, मुलींना, युवा वर्गाला द्यायच्या आहेत. बुधवारी अल्पसंख्यांकांसाठी मार्टीची स्थापना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करण्याची आमची भूमिका आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेतून आम्ही पुढे जात आहोत.
हेही वाचा – ‘मुख्यमंत्री करणार म्हणाले असते तर पक्षच आणला असता’; अजित पवारांचं मोठं विधान
मराठा आरक्षणासंदर्भात प्रत्येकाला जी भूमिका योग्य वाटते आहे ते ती भूमिका मांडत आहे. त्याबद्दल कोणाचाच विरोध असण्याचे कारण नाही. अनेकदा सभागृहात देखील एकमताने याबाबतचे निर्णय झाले आहेत. सर्व राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा दिला आहे. वेळोवेळी निर्णय घेतले होते. काही निर्णय दुर्दैवाने हायकोर्टात टिकले नाही. काही निर्णय हायकोर्टात टिकले मात्र सुप्रीम कोर्टात टिकले नाही. आमचा हाच प्रयत्न आहे की, जे काही द्यायचे आहे ते देत असताना ते समाजाला मिळाले पाहिजे. इतरांवर कुठलाही अन्याय होता कामा नये, या पद्धतीने आमचे काम सुरू आहे, असं अजित पवार म्हणाले.
आमच्या तीनही पक्षांकडे ज्या ज्या जागा आहेत त्या त्या जागा त्यांच्याकडे ठेवल्या जातील. पण जर काही सिटींग जागा बदलायच्या असतील तर त्याही प्रकारची तयारी आणि मानसिकता तिन्ही पक्षांनी आणि मित्र पक्षांनी ठेवली आहे. आता लवकरच त्याला अंतिम स्वरूप दिलेले आपल्या पाहण्यात येईल, असंही अजित पवार म्हणाले.





