शरद पवारांवर माझेही प्रेम आहे; बारामतीत अजित पवारांचे वक्तव्य

पुणे | राष्ट्रवादीत झालेल्या घडामोडीनंतर बारामतीच्या राजकारणात निर्माण झालेल्या परिस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांपुढे प्रश्न निर्माण झाला होता. शरद पवार यांच्यावर बारामतीकरांचे प्रेम आहे, तसेच माझेही प्रेम आहे. मी का प्रेम करू नये? फक्त राजकीय भूमिका वेगळी घेतली,” असे ते म्हणाले. बारामतीतील राष्ट्रवादी भवनात नगरपरिषद व माळेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
कालपर्यंत शरद पवार आणि मी एकत्र होतोच ना. शरद पवार यांच्यामुळेच मी पहिल्यांदा निवडून आलो. मी काही आभाळातून पडलो का? असा सवाल करून अजित पवार म्हणाले, राजकारणात संकुचित विचारांचे राहून चालत नाही. माणसं जोडायची असतात. काही गोष्टी घडतात; पण झालं गेलं गंगेला मिळालं, असे म्हणत पुढे जायचे असते.
हेही वाचा : ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाची 15 एकर शासकीय जमीन बिनबोभाट लाटली!
तुम्हाला विकास हवा की गटातटाचे राजकारण? हे ठरवणारी ही निवडणूक आहे. तुम्ही माझे ऐकले, तर मी तुमचे ऐकेल आणि विकासाची गती कायम ठेवेल. बारामती हे माझे ‘होम ग्राउंड’ असल्याने इथे मला अधिक लक्ष द्यावे लागेल. 17 तारखेपर्यंत एबी फॉर्म द्यायची मुदत आहे. पण, मी लवकरच बारामती व माळेगावचे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष व नगरसेवकपदाचे उमेदवार जाहीर करून प्रचाराला सुरुवात करणार आहे.
राष्ट्रवादीकडे तिकीट मागणारे सर्वजण तोलामोलाचे आहेत. परंतु, जागा मर्यादित असल्याने काहींना थांबावे लागेल. त्यामुळे निवडणुकीत रुसवे-फुगवे, गटतट नकोत. आपण एकसंध असलो, तर कोण मायेचा लाल आपल्याला अडवू शकत नाही. तुम्ही मला जेवढा मोठा विजय मिळवून द्याल तेवढा माझा मान वाढणार असल्याचे पवार म्हणाले.




