Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

तृणमूलच्या २० बंडखोर खासदारांचा गट ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी’त विलीन; लोकसभा अध्यक्षांना पत्र

नवी दिल्ली | पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षामध्ये रविवारी फार मोठी बंडखोरी पाहायला मिळाली. पक्षातून बाहेर पडलेल्या २० बंडखोर खासदारांनी रविवारी आपला गट ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ (एनसीपी) या पक्षात विलीन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या विलीनीकरणानंतर बंडखोर खासदारांनी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

या २० बंडखोर खासदारांनी नवी दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी आपल्या गटाचे ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ या पक्षात विलीनीकरण केल्याचे आणि एनडीएला पाठिंबा देत असल्याचे अधिकृत पत्र लोकसभा अध्यक्षांना सुपूर्द केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेत स्वतंत्र गट स्थापन करण्यामध्ये मोठ्या कायदेशीर गुंतागुंती निर्माण होऊ शकत होत्या. हा कायदेशीर पेच टाळण्यासाठीच बंडखोर खासदारांनी थेट या पक्षात विलीन होण्याचा पर्याय निवडला.

ममता बॅनर्जी यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे ज्येष्ठ नेते सुदीप बंडोपाध्याय यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर बंडखोर गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे बंडखोरांच्या छावणीला मोठे बळ मिळाले आहे.

हेही वाचा

युद्ध अखेर संपलं! अमेरिका-इराणमध्ये अखेर ऐतिहासिक शांतता करार; इराणचं मौन

बंडखोर खासदार आणि आमदारांच्या आग्रहास्तव आणि आवाहनानंतरच आपण हा निर्णय घेतल्याचे बंडोपाध्याय यांनी स्पष्ट केले. “आम्ही ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ या मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षात सामील झालो आहोत. आमचा गट आता त्यात पूर्णपणे विलीन झाला आहे. आता खरी टीएमसी कोणती, याचा फैसला न्यायालयात केला जाईल,” असे म्हणत सुदीप बंडोपाध्याय यांनी थेट ममता बॅनर्जी यांना न्यायालयीन लढाईचा थेट इशारा दिला आहे.

नेमक्या कशा घडल्या घडामोडी?

रविवारी दिल्लीत राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला होता. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासोबत बंडखोर नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर काही तासांतच २० बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांच्या निवासस्थानी धाव घेतली आणि विलीनीकरणाचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला.

अभिषेक बॅनर्जी यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

तृणमूल काँग्रेसमध्ये झालेल्या या प्रचंड मोठ्या बंडखोरीनंतर पक्षाचे सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी तातडीने पावले उचलली आहेत. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक अधिकृत पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी, “संसदेत तृणमूल काँग्रेसला एकच अखंड राजकीय पक्ष म्हणून ग्राह्य धरण्यात यावे आणि पक्षातून बाहेर पडलेल्या कोणत्याही वेगळ्या गटाला किंवा विलीनीकरणाला अधिकृत मान्यता देऊ नये,” असे आग्रही आवाहन लोकसभा अध्यक्षांना केले आहे. त्यामुळे आता बंगालच्या या राजकीय युद्धाची लढाई दिल्लीत आणि पर्यायाने न्यायालयात गाजण्याची चिन्हे आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button