इंद्रायणीच्या शुद्धीकरणासाठी ५२५ कोटी; उदय सामंत यांची माहिती

मुंबई : सर्वसामान्यांसह वारकरी सांप्रदायासाठी महत्त्वाच्या असलेल्या इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणासाठी अमृत योजनेतंर्गत ५२५ कोटी रूपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे इंद्रायणी तसेच पवना नदीच्या शुद्धीकरणासाठी व्यापक उपाययोजना करणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवड महानगरातील मेट्रो, नदी सुधार, पर्यटन विकास आदी मुद्यांवर भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी इंद्रायणी नदीतील वाढत चाललेल्या प्रदूषणाकडे सरकारचे लक्ष वेधले.
पीएमआरडीएच्या माध्यमातून नदी प्रदूषण रोखण्यासाठी विविध शुद्धीकरण प्रकल्प (ट्रीटमेंट प्लांट) उभारले जात आहेत. परंतु स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अनेक उद्योगांमध्ये प्रदूषित पाणी शुद्ध करण्यासाठीचे प्लांट पूर्ण क्षमतेने चालवले जात नाहीत, तसेच काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळी हे प्लांट बंद केले जातात, अशी तक्रार आहे. या संदर्भात सर्व उद्योगांनी प्रदूषित पाण्याचे योग्य शुद्धीकरण करूनच ते नदीमध्ये सोडावे, यासाठी शासनाने काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी दिले.
इंद्रायणी नदी स्वच्छता आणि शुद्धीकरणासाठी अमृत योजनेंतर्गत सुमारे ५२५ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या प्रकल्पाच्या निधीमध्ये केंद्र शासनाचा २५ टक्के, राज्य शासनाचा २५ टक्के आणि महानगरपालिकेचा ५० टक्के असा वाटा आहे. या निधीतून नदी स्वच्छता, सांडपाणी प्रक्रिया आणि प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत. या प्रकल्पांमुळे इंद्रायणी नदीत सोडले जाणारे सांडपाणी रोखणे, शुद्धीकरण प्रकल्प उभारणे तसेच नदीचे प्रदूषण कमी करणे यासाठी मोठी मदत होणार असल्याचे सामंत म्हणाले.
वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली इंद्रायणी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. याशिवाय पवना नदीच्या शुद्धीकरणासाठीही स्वतंत्रपणे उपाययोजना करण्यात येतील. या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित विभाग आणि प्रशासन यांच्यासोबत समन्वय साधून पुढील कार्यवाही केली जाणार आहे, असेही सामंत यांनी सांगितले.





