‘विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी’, अमृता फडणवीस यांचा संजय राऊतांना टोला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Amruta-Fadnavis-And-Sanjay-Raut-1280x720-1.jpg)
मुंबई | अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई पोलीस आणि मुंबई बाबत केलेल्या वक्तव्यानंतर तिच्या विरोधात टिकेची झोड उठली आहे. तसेच याच मुद्द्यावरून सुरु असलेलं कंगना रनौत आणि संजय राऊत यांच्यातील वाकयुद्ध काही संपायचं नाव घेत नाही. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही कंगनानं आता साऱ्या महाराष्ट्राचीच माफी मागावी अशी मागणी केली होती.
त्यावेळी तिच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी ‘हरामखोर’ हा शब्द वापरला असल्याचं बोलंलं जात आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमाशी संवाद साधताना या शब्दाच्या वापराबाबत स्पष्टीकरण दिल्याची माहिती समोर आली आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना संजय राऊत यांनी ‘अभिनेत्री कंगना रनौत म्हणजे, नॉटी गर्ल’, असं म्हणाले होते. तसेच त्यावेळी बोलताना त्यांनी हरामखोर म्हणजे, मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजेच, खट्याळ मुलगी असून ती बेईमान आहे. असं मला वाटतं’, असं संजय राऊत म्हणाले होते.
मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटू लागली असल्याच्या वक्तव्यानंतर कंगना आणि संजय राऊत यांच्यातील या आरोप-प्रत्यारोपांच्या सत्राला सुरुवात झाली. अशातच आता या वादात आता अमृता फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर त्यांच्याच वक्तव्याचा आधार घेत निशाणा साधला आहे.
अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या की, ‘आम्ही विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी आहेत.’ तसेच अमृता फडणवीस यांनी हे ट्वीट करताना #Naughty हा हॅशटॅगही वापरला आहे. तसेच त्यांनी हे ट्वीट करताना राऊतांचं नाव न घेता संजय राऊत यांना टोला लगावला आहे. याआधीही कंगनाच्या समर्थनार्थ बोलताना अमृता फडणवीस यांनी शिवसेनेच्या जोडो मारो आंदलनावरही टिका केली होती.