८० कोटी गरिबांचा आधार बनलेली पीएमजीके योजना उद्यापासून बंद
नवी दिल्ली – कोरोना काळात गरीबांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना उद्या ४ नोव्हेंबर २०२१ पासून बंद होणार आहे. याचा परिणाम देशातील ८० कोटी गरीब जनतेवर होणार आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे, व्यवसायिक आस्थापने आणि इतर सर्व व्यवहार बंद झाले होते. या काळात हातावर पोट असलेल्या गरिबांना मदत करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरू केली होती. त्यात रेशन कार्डधारकांना महिन्याला ५ किलो तांदूळ आणि ५ किलो गहू मोफत दिले जात होते. हे धान्य त्यांना दर महिन्याच्या कोट्यापेक्षा जास्त दिले जात होते. नंतर योजनेची मुदत संपल्यामुळे ती पुन्हा वाढवण्यात आली होती. परंतु आता ४ नोव्हेंबरला या योजनेची मुदत संपणार आहे. तिला पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे ती बंद होणार आहे. याचा परिणाम देशातील ८० कोटी गरिबांवर होणार आहे. कोरोना काळात गरीब नागरिकांना या योजनेचा फायदा मिळत होता. मात्र वाढत्या महागाईत हे धान्य बंद झाल्यामुळे त्याचा मोठा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे.