PMC बॅंक घोटाळ्याप्रकरणी महाविकासआघाडीचा मोठा निर्णय !
मुंबई – महाविकासआघाडी सरकारने एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यापूर्वी पीएमसी बॅंकेत झालेल्या घोटाळ्यासंबंधी हा निर्णय आहे.महाराष्ट्र सरकार आता पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींची मालमत्ता जप्त करणार आहे. त्यामुळे आता पीएमसी बँक घोटाळ्यातील रक्कम वसुलीसाठी राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि एचडीआयएलची मालमत्ता विकून वसुली करण्यात येणार आहे. या मालमत्तेचा लिलाव करुन पैसे वसूल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे.
शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींची मालमत्ता जप्त करुन खातेदारांची रक्कम अदा करावी, अशी मागणी केली होती. PMC Bank घोटाळ्याप्रकरणी शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी तक्रार केली होती. या तक्रारीला उत्तर देतानाच सतेज पाटील यांनी आरोपींच्या मालमत्ता विकून आर्थिक वसूली केली जाणार असल्याची माहिती दिली.यावर राज्य सरकारने मालमत्ता जप्त करुन लिलाव करण्याचा निर्णय घेतल्याचं पत्र गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी तक्रारदारांना लेखी पत्राद्वारे दिले आहे.