पुणे- नाशिक महामार्गावर ‘नळावरील भांडण’; खासदार कोल्हे- माजी खासदार आढळराव यांच्यात ‘श्रेयवाद’
- शिरूर लोकसभा मतदार संघात ‘आघाडीत बिघाडी’
- कोल्हे- आढळराव यांच्यातील वादाने पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढणार
शिरूर – पुणे – नाशिक महामार्गावरील खेड बायपास व नारायणगाव बायपास या रस्त्याचे उद्घाटन श्रेय लाण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी पुन्हा एकदा आमने सामने आले आहे. एकीकडे शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काल (शुक्रवारी) बायपास रस्त्यांचे उद्घाटन करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. तर दुसरीकडे आज (शनिवारी) राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुन्हा नव्याने उद्धाटन केले. त्यामुळे आजी माजी खासदाराच्या श्रेयवादाच्या लढाईत बायपास रस्त्याला राजकीय गालबोट लागले आहे.
खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे काम पुर्ण झाले नाही, असे असताना राष्ट्रवादीच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शनिवारी (दि. १७) सकाळी खेड व नारायणगाव बाह्यवळण कामाचे उद्घाटन करण्याचे नियोजन केले होते. तसे संदेश समाज माध्यमांवरआले. त्यात घड्याळ, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार अमोल कोल्हे, खेडचे आमदार दिलीप मोहिते, आमदार अतुल बेनके यांचे छायाचित्र होते. मात्र, माजी खासदार आढळराव पाटील यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून हे उद्घाटन शुक्रवारीच (दि १६) मोठा गाजावाजा करीत उरकून घेतले. यावेळी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, खासदार डॉ. अमोल कोल्हे याना लक्ष केले.
आढळराव म्हणाले, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मतदार संघात गेल्या दोन वर्षातील ठळक कामे दाखवावीत. खेड-सिन्नर चौपदरीकरण काम त्यातही प्रलंबित होत गेलेले खेड घाट बाह्यवळण, नारायणगाव बाह्यवळणाच्या कामांसाठी आम्ही प्रयत्न आणि पाठपुरावा केला. यामुळे या मार्गाचे उद्घाटन करण्याचा अधिकार आमचा आहे. दोन वर्षात रेल्वेचा प्रकल्प मार्गी लागतो का? दुसऱ्यांच्या कामांचे श्रेय लाटू नये असा टोलाही आढळराव पाटील यांनी खासदार डॉ अमोल कोल्हे यांना लगावला.
दुसरीकडे विद्यामान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ठरल्या प्रमाणे आज (शनिवारी) पुन्हा नव्याने उद्धाटन केले. अमोल कोल्हे म्हणाले, या कामाचे खरे श्रेय हे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे आहे. मी फक्त कर्तव्य म्हणून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी व आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे खेडघाटाचे लोकार्पण या शेतकऱ्यांच्या हस्ते करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. परंतू काही हितचिंतक लोकांची दिशाभूल करत आहेत. खऱ्या अर्थाने रस्त्याचे काम करण्यामध्ये राष्ट्रवादीचा मोठा वाटा आहे. माजी खासदारांकडून बीनबूडाचे आरोप करत आहेत. ते खपवून घेतले जाणार नाही. तुम्हाला जर शंका असेल तर २०१८ मधील संसदेतील माझे भाषण ऐका, सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. उगच चुकीचे आरोप करून लोकांची दिशाभूल करू नका. हे खपवून घेतले जाणार नाही, असा सणसणीत टोला कोल्हे यांनी लगावला आहे. त्यामुळे दोन्ही आजी माजी खासदाराच्या श्रेयवादाच्या लढाईत रस्त्याला मात्र राजकीय रंग आला आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघातील पुणे नाशिक रस्त्यावरील खेड घाट व नारायणगाव बायपास या रस्त्याचे काम शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटील खासदार असताना मंजूर झाले. नंतरच्या कालावधीत काम बंद पडले होते. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट घेऊन आढळराव पाटलांनी हे काम पुन्हा चालू केले. काम पूर्णत्वास येत असताना मागील दीड वर्षात खासदार अमोल कोल्हे यांनी मतदार संघात एकही ठोस काम न करता या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर पायाभूत सर्व्हे व इतर सर्व अडथळे पार करण्यासाठी जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आग्रही भूमिका घेतली होती. रेल्वे काय १ वर्षात आली काय? मात्र कोल्हे रेल्वेचे श्रेय घेऊन जनतेची दिशाभुल करत आहे. खेड व नारायणगाव या बाह्यवळण रस्त्याचा मी पाठपुरावा केला आहे. म्हणून शिवसेनेच्या वतीने हा रस्ता खुल्ला केला आहे, असे माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी सांगितले.