महामार्गावरील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे वाहतूक कोंडी; वाहनचालकांसह पादचारी हैराण!
![Traffic jams due to poor condition of highways;](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/WhatsApp-Image-2021-07-31-at-4.32.47-PM.jpeg)
चाकण | प्रतिनिधी
पुणे – नाशिक व अहमदनगर – मुंबई या राज्यमार्गाला जोडणाऱ्या चाकण येथील महामार्गावरील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या दुरावस्थेमुळे चाकणला वाहतूक कोंडीने डोके वर काढले असून, याचा मनस्ताप वाहनचालकांसह पादचा-यांना सहन करावा लागत आहे.
चाकण – तळेगाव दाभाडे रस्त्यावरील चाकण गावच्या हद्दीतील राणूबाईमळ्यात अगदी रस्त्यालगत सखल भागात सांडपाणी साचत असल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हे सांडपाणी साचत असल्याने वाहतूक कोंडी होत असून, या भागातील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीशी सामना करावा लागत आहे. चाकण ग्रामीण रूग्णालयासमोर, तळेगाव चौकातील उड्डाणपूलालगत आणि युनिकेअर हॉस्पिटल समोर पावसामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, रस्त्याच्या मध्यभागी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यात साचलेल्या सांडपाण्यामुळे प्रवासी व स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, महामार्गावर वाहतूकीस रोजच अडथळा निर्माण होवू लागला आहे. कोरोनाच्या काळात सुरु असलेल्या निर्बंधामुळे येथील तळेगाव चौक निर्मनुष्य दिसत होता. तुरळक वाहतूक होती. निर्बंध उठले आणि आता सुरु झाली पावसची रिमझिम, यामुळे रस्ते खड्डेमय झाल्याने रस्ते कंपनीचे पहिल्याच पावसात पितळ उघडे पडले आहे. याचा ताण वाहतुकीवर होत आहे. चाकण मध्ये एकेरी सेवांतर्गत रस्त्यावर दुहेरी वाहतूक सुरु असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. येथील तळेगाव चौकातून पुढे राणूबाईमळा, खराबवाडी मार्गे तळेगाव दाभाडेकडे जाण्याचा जिल्हा मार्ग आहे. या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी याठिकाणी कसलीच व्यवस्था नसल्याने रस्त्यालगत सांडपाणी साचून दुर्गंधी सुटली आहे. कामगार व स्थानिक नागरिकांची येथून नेहमी ये जा सुरु असते. या जिल्हा मार्गावर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेकदा मोठे अपघात झाले आहेत. अनेकांचे नाहक बळी गेले आहेत. रस्ते कंपनी मात्र नावाला रस्त्याची मलमपट्टी करत आहेत.