Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भामा आसखेड योजनेतील जलवाहिनीच्या कामाला वेग

पिंपरी : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी हाती घेतलेल्या भामा आसखेड जलवाहिनीच्या कामाची चार वर्षांची मुदत संपूनही केवळ ४८ टक्के काम झाल्यामुळे महापालिकेने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली. नोटीस मिळताच ठेकेदाराने कामाचा कृती आराखडा सादर केला. काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर १६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उपलब्ध होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या पवना धरणातून ५१०, आंद्रा धरणातून तात्पुरत्या स्वरूपात इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्यावरून ८०, एमआयडीसीकडून २० असे ६१० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणीपुरवठा केला जात आहे. मागील पाच वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शहराची वाढती लोकसंख्या पाहता महापालिकेने मावळातील आंद्रा धरणातून १०० आणि खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून १६७ असे २६७ एमएलडी पाणी आणण्याचे नियोजन केले. खेड येथील वाकी तर्फे वाडा येथील अशुद्ध जलउपसा केंद्रापासून तळेगाव दाभाडे एमआयडीसीतील नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टँकपर्यंत ७.३० किलोमीटर आणि तेथून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी नेण्यासाठी १८.८० किलोमीटर अंतर १४०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येत आहे.

हेही वाचा    –      डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

या कामासाठी पाणीपुरवठा विभागाने २०२० मध्ये निविदा प्रक्रिया राबवून १५ डिसेंबर २०२० रोजी ऑफशोअर इंडिया लि. या ठेकेदाराला काम दिले. त्यासाठी १६२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कामाची मुदत डिसेंबर २०२४ अशी चार वर्षांची हाेती. मात्र, या मुदतीत केवळ ४८ टक्के काम पूर्ण झाले. वारंवार सूचना देऊनही कामाला गती येत नव्हती. त्यामुळे प्रशासनाने ठेकेदाराला नोटीस बजावली. त्यानंतर ठेकेदाराकडून पुढील काळात कशाप्रकारे जलदगतीने काम हाेईल, याचा आराखडा सादर केला आहे. नाेटीस मिळताच ठेकेदाराने जलवाहिनीच्या कामाला गती दिली आहे. जलवाहिनीच्या कामासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात येणार आहे.

जलवाहिनीचे काम सुरू असलेल्या मार्गावर खडक लागला आहे. त्यामुळे जलवाहिनीच्या कामाला विलंब हाेत आहे. तसेच ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, वन, पाटबंधारे अशा विविध विभागांच्या जागा ताब्यात येण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे काम पूर्ण करण्यात अडथळा येत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते.

भामा आसखेड जलवाहिनीचे काम संथगतीने सुरू असल्याने ठेकेदारासोबत आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांनी बैठक घेतली. संबंधित ठेकेदाराला नाेटीस दिली. त्यानंतर ठेकेदाराने कामाला गती दिली आहे. वेगात जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यास प्राधान्य  असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button