उद्योजक, कामगारांचे प्रश्न सोडविण्यात सर्वच राजकीय पक्ष अपयशी – अभय भोर
पिंपरी चिंचवड | उद्योजकांचे आणि कामगारांचे प्रश्न सोडविण्यात शहरातील सगळ्याच राजकीय पक्षांना अपयश आले आहे. त्यामुळे कामगार आणि उद्योजक एकत्रित लढा उभारणार असल्याचे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिकनगरी म्हणून विकसित झाल्यानंतर औद्योगिक परिसरामुळे महापालिकेला नावलौकिक मिळाले. मोठ्या प्रमाणात महापालिकेची अर्थव्यवस्था ही जागतिक दर्जाची झाली. परंतु, आजच्या घडीला महापालिकेतील कामगारांचे उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यात कोणत्याही पक्षाने महत्त्वाची भूमिका बजावली नाही. या पुढील काळामध्ये कामगार आणि उद्योजक मिळून एकत्रित प्रश्न सोडविण्यासाठी लढा उभारणार असल्याचे भोर यांनी सांगितले.
एमआयडीसी भागातील उद्योजकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. जागेच्या समस्या आहेत. एमआयडीसीतील जागा बिल्डर लोकांच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक उद्योजकांना खंडणीसाठीसाठी धमक्या येत आहेत. अनेक कामगारांचे प्रश्न हे कोर्टात कित्येक वर्ष पडून आहेत. कंपनी विकून दुसरा कंपन्या त्या जागी आल्या तरी कामगारांचे प्रश्न सुटत नाहीत. कामगार अजून उपेक्षितच आहे. न्याय मागायचा कुणाकडे हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला असून पुढील काळामध्ये उद्योजक आणि कामगारांनी एकत्रित येऊन देण्याचे लढा देण्याचे ठरविले आहे. महापालिका निवडणुकीत त्याचा परिणाम सर्वच पक्षांना दिसून येणार असल्याचे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.