‘कोरोना योद्धा’ पत्रकार पांडूरंग रायकर यांच्या कुटुंबियांना १ लाखाची मदत
![1 lakh assistance to the family of 'Corona Warrior' journalist Pandurang Raikar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Mahesh-Landge-1-1.jpg)
चिखली-मोशी- चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशनतर्फे सन्मान सोहळा
पुण्यातील रायकर कुटुंबियांनी पिंपरी-चिंचवडकरांचे मानले आभार
पुणे । प्रतिनिधी
कोरोना महामारी आणि लॉकडाउनच्या काळात समाजातील घटनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जीव धोक्यात घालून पत्रकारितेचे व्रत जोपासणारे कै. पांडूरंग रायकर यांच्या कुटुंबियांना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढकाराने १ लाख रुपयांची मदत करण्यात आली. तसेच, ‘अनसंग वॉरिअर्स’या पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले.
कै. पांडुरंग रायकर यांच्या पत्नी शितल रायकर यांनी धनादेश आणि पुरस्कार स्वीकारला.
पिंपरी-चिंचवडमधील चिखली-मोशी-चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशन आणि अविरत श्रमदान या संस्थेच्या पुढाकाराने ‘अनसंग वॉरिअर्स, प्राईड ऑफ पिंपरी-चिंचवड’ या पुरस्कारांचे वितरण शनिवारी करण्यात आले. भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात हा सन्मान व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता.
यावेळी पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, भोसरीचे आमदार महेश लांडगे आदी उपस्थित होते.
कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य अन् सुरक्षिततेसाठी लढणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील प्रातिनिधिक स्वरुपात २५ कोरोना योद्धांचा गौरव करण्यात आला.
पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला होता. त्यावेळी टीव्ही-९ मराठी वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडूरंग रायकर यांनी जीव धोक्यात घालून पत्रकारिता केली. कोरोनामुळे रायकर यांचा मृत्यू झाला. प्रशासनाचा ढिसाळपणा आणि निर्ढावलेल्या व्यवस्थेचा एक उमदा पत्रकार बळी ठरला, अशी टीका राज्यभरातून झाली होती. रायकर कुटुंबियांनी आपला आधार गमावला होता. कोरोना योद्धा म्हणून या कुटुंबियांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘अनसंग वॉरिअर्स’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, अशी माहिती फेडरेशनचे सचिव संजीवन सांगळे यांनी दिली.
पांडुरंग रायकर यांचा अल्प परिचय
पत्रकार पांडुरंग रायकर हे श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील सामान्य कुटुंबातील होते, कुटुंबात कुणीही सुशिक्षित नसल्याने शिक्षणाचा ध्यास घेत अत्यंत हालाकीची परीस्थिती असताना कठीण परीस्थितीत शिक्षण पूर्ण केले. २००४ ते २००५ साली रानडे इन्सिट्यूट येथे पत्रकारितेची पदवी देखील त्यांनी घेतली होती. त्याकाळातच त्यांनी (लॉ) कायद्याची पदवी घेतली. २००६ ते २००७ साली पुणे येथे दै. केसरी या वर्तमान पत्रातून पत्रकारितेचा श्रीगणेशा त्यांनी केला २००७ ते २००८ दै. सामना येथे काम केले. २००८ ते २०१२ साली हैद्राबाद येथे ETv मराठी या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधीत्व केलं. त्यानंतर दै. तरुण भारत, दै.पुण्य नगरी मुंबई येथे उपसंपादक म्हणून काम पाहिले. त्यानंतर मुंबईत एबीपी माझा या वृत्तवाहिनीत ते रुजू झाले. २०१४ साली त्यांची अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर २०१८ साली ते पुणे येथील Tv-9 मराठी या वृत्तवाहिनीत वरिष्ठ पत्रकार म्हणून काम पहात होते. त्यांच्या मागे पत्नी, आई, वडील, एक मुलागा एक मुलगी व तीन बहिणी असा मोठा परीवार आहे.