‘एमपीएससी’ परीक्षेत नापास झाल्यामुळे भाजप शहराध्यक्षाच्या मुलाची आत्महत्या

पिंपरी, (महाईन्यूज) – ‘एमपीएससी’ परीक्षेत नापास झाल्याने नैराश्यग्रस्त तरुणाने राजगुरुनगर येथील भीमानदीवरील केदारेश्वर बंधाऱ्याच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना आज गुरुवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली.
रूपेश विष्णू बोऱ्हाडे ( २८, रा. तिन्हेवाडी रोड, राजगुरुनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो राजगुरुनगर भाजपचे माजी शहराध्यक्ष विष्णू शिवराम बोऱ्हाडे यांचा मुलगा आहे. विष्णू यांनी खेड पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपेश हा ३ वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फेत (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी पुण्यात राहून अभ्यास करत होता. गेल्या काही दिवसांपूर्वी रूपेश याने दिलेल्या एमपीएससीच्या परीक्षेचा निकाल लागला होता. या परीक्षेत तो नापास झाला होता. तेव्हापासून तो नाराज होता. सध्या तो अभ्यासासाठी शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथे राहण्यास आला होता. दरम्यान, मानसिकरीत्या खचून गेल्याने रूपेश याने स्वत:च्या पाठीवरील बॅगमध्ये मोठा दगड व शैक्षणिक कागदपत्रे टाकून राजगुरुनगर येथील भीमानदीवर असलेल्या केदारेश्वर बंधाऱ्यात उडी मारून आत्महत्या केली.
बुधवारी सकाळी १० वाजता नदीपात्रात एक मृतदेह तरंगत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. तत्पूर्वी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी रूपेशचा मृतदेह बाहेर काढला. यावेळी खिशात असलेल्या पासपोर्टवरून रूपेशची ओळख पटली. खेड पोलीस अधिक तपास करीत आहेत.





