PCMC : अत्याचाराच्या घटनेबाबत पालकमंत्र्यांचे मौन?, म्हणजे कुठे तरी नक्कीच पाणी मुरतंय – अजित पवार
पिंपरी, (महा ई न्यूज) – कासारसाई येथील दोन मुलींवर अत्याचार झाला. त्यातील एका मुलीला आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर पिंपरीतील एचए मैदानावर एका मुलीचा मृतदेह सापडला. या दोन्ही दुख:द घटनांच्या बाबतीत जबाबदार नेतृत्व म्हणून पालकमंत्री समोर येऊन चक्कार शब्द बोलायला तयार नाहीत. पोलीस प्रशासनाला आदेश देऊन गुन्हेगारीवर अंकूश ठेवण्याची जबाबदारी पालकमंत्री झटकून लावीत आहेत, म्हणजे कुठे तरी पाणी मुरतय, असा संशय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर व्यक्त केला.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची मोठ बांधण्यासाठी पवार यांनी पिंपरीतील पक्षाच्या कार्यकर्त्यांची सोमवारी (दि. 1) चिंचवड येथील एखा खासगी हॉटेलमध्ये बैठक घेतली. तत्पुर्वी, पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पक्षाची भूमिका मांडली. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, नेते नाना काटे, माजी महापौर योगेश बहल, स्वीकृत नगरसेवक भाऊसाहेब भोईर, स्थायी समितीचे माजी सभापती हिरानंद आसवानी, युवकाध्यक्ष विशाल वाकडकर आदी यावेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, शहरात गुन्हेगारी वाढत आहे. विशेषतः मुली, महिलांची सुरक्षा संकटात आली आहे. पोलीस आयुक्तालय होऊन देखील कायदा व सुव्यवस्था अबाधित दिसत नाही. खून, मारामा-या, चो-या आदींचा वाढता टक्का पहायला मिळत आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. कासारसाई येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचार व एकीचा खून झाला. यावर पालकमंत्री गिरीश बापट यांनी समोर येऊन एकही वक्तव्य केलेले नाही. याचा अर्थ कुठे तरी पाणी मुरतंय. भाजप नेत्यांची भूमिका संशयास्पद वाटू लागली आहे, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.
समविचारी पक्षाचाच आघाडीमध्ये समावेश असेल
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासह घटक पक्षाची आघाडी करण्याच्या हालचाली राज्य पातळीवर सुरू आहेत. त्यात मनसेचाही समावेश होण्यासाठी सकारात्मक कल आहे. मात्र, मनसेवर जातीयवादी पक्षाचा शिक्का पडल्याने या पक्षाचा आघाडीत समावेश करून घेण्याबाबत संशयास्पद हालचाली आहेत. याबाबत विचारले असता आघाडी करताना जातीयवादी पक्षाचा विचार केला जाणार नाही. समविचारी पक्षालाच आम्ही समावून घेणार आहोत, असे अजित पवार यांनी सांगितले.