‘गिरीष बापटांना पाहून पर्रिकर आठवले…आमच्या भूमिकेमुळे हे घडत असल्याचा मानसिक त्रास’
त्रास गिरीष बापट साहेबांना जाणवत होता; मात्र, यातना आम्हाला जाणवत होत्या
पुणे: दिवंगत आमदार मुक्ता टिळकांच्या निधनाने कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडून हेमंत रासणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकरांना रिंगणात उतरविण्यात आलं आहे. चिंचवड आणि कसबा विधानसभा कायम राखण्यासाठी भाजपने प्रतिष्ठापणाला लावलेली आहे. भाजप नेते गिरीष बापटांची प्रकृती स्थिर नसूनही गुरूवारी प्रचार केला होता. अशातच हिंदू महासंघाचे आनंद दवेंनी भाजपवर उपरोधिक टिका केली आहे.
बापट पाहून आम्हाला पर्रिकर आठवले. आज मी व्यक्तीश: प्रचार करणार नाही, असं आनंद दवेंनी म्हटलं आहे. त्रास बापट साहेबांना होत होता. मात्र,यातना आम्हाला जाणवत होत्या. आमच्या भूमिकेमुळे हे घडत आहे. याचा मानसिक त्रास आम्हाला होत आहे. भाजपचा हा सगळा प्रयत्न फक्त पोटनिवडणूका जिंकण्यासाठी होत आहे. त्यामुळे भाजपने गिरीष बापटांना मैदानात उतरवलेलं आहे. त्याकरिता जर हिंदू महासंघ कारणीभूत असेल तर आम्हाला आत्मक्लेश होत आहे, असं आनंद दवे म्हणाले आहेत.
गुरूवारी केसरीवाडा येथे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात गिरीष बापट यांनी उपस्थिती लावली होती. मात्र, त्यानंतर गिरीष बापटांची प्रकृती खालावल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गिरीष बापट यांना आठवड्यातून दोन वेळेस डायलिसिस करावे लागते. त्यामुळे ते बाहेर जाणे टाळतात. बापटांना पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कसबा पोटनिवडणूकीमध्ये चुरस नाही. भाजपचाच उमेदवार विजयी होईल, असं गिरीष बापट म्हणाले होते.
दरम्यान, मुक्ता टिळकांच्या निधनानंतर कुटूंबियांना उमेदवारी देण्यात यावी, अशी काही लोकांनी मागणी केली होती. हेमंत रासणेंना उमेदवारी दिल्यानंतर ब्राम्हण समाज नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. कसब्यात काही बॅनर्स देखील लागले होते. अशातच गिरीष बापट प्रचारात उतरल्याने आनंद दवे यांनी चिंता व्यक्त केली आहे.