डोंबिवलीत देशमुख होम्स संकुलात ‘पाणीबाणी’; पाण्यासाठी महिलांनी उपसले आमरण उपोषणाचे हत्यार
डोंबिवलीः डोंबिवलीतील देशमुख होम्स संकुलातील रहिवासी गेल्या कित्येक महिन्यांपासून पाण्याच्या समस्येने हैराण आहेत. पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करुन देखील पाणी मिळत नाही आहे. अखेर या रोजच्या त्रासाला कंटाळून देशमुख होम्स मधील महिलांनी आमरण उपोषणाची हाक दिली आहे.
डोंबिवली पूर्वेतील टाटा पॉवर परिसरात देशमुख होम्स हे मोठे संकुल आहे. या संकुलात १३५० सदनिकाधारक राहतात. केडीएमसी मधील २७ गावांसह या भागात देखील गेल्या कित्येक महिन्यापासून पाणी समस्या ही जटील होत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने वेळोवेळी पाण्यासाठी आम्हाला विविध उपाययोजना करण्याची स्कीम दिली. त्यानुसार २०१६पासून स्व खर्चाने पाणी लाईन घेणेपासून ते टॅपिंग व्यास वाढविणे, झोनिंग करणेपर्यंत लाखो रुपये खर्चून स्वखर्चाने आम्ही योजना केल्या. उपाय योजना केल्यानंतर सुरुवातीला ८ ते १० दिवस ८०० ते ९०० युनिट पर्यंत पाणी दाखवून नंतर ते पुन्हा २०० ते ३०० युनिटवर आणले जाते. याविषयी लोकप्रतिनिधी, एमआयडीसी, पालिका अधिकारीसाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या मात्र प्रश्न सुटला नाही आहे.
पाणी प्रश्नावरुन स्थानिक नागरिकांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पालिका प्रशासन, एमआयडीसी अधिकारी सर्वांची भेट घेतली. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील याप्रश्नी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतू कोणताही मार्ग न निघाल्याने येथील नागरिक वंदना सोनावणे आणि इतर महिला यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. प्रशासन आता यावर काय तोडगा काढते हे पहावे लागेल.
केडीएमसीचे म्हणणे काय?
म्हणते येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी १५० मी.मी. व्यासाची नळ जोडणी दिली आहे. संकुलातील अंतर्गत वितरण वाहिनीमध्ये सुधारणे करणे व अंतर्गत झोनिंग करण्यासाठी आमदार राजू पाटील यांनी आमदार निधी दिला आहे. त्यानुसार प्राकलन तयार करण्यात आले आहे. संकुलातील इमारतींनी संकुलाच्या वितरण वाहिनीवर बुस्टरपंप जोडलेले असून ते काढण्यासाठी संबंधितांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.
तसंच, एमआयडीसीने पिंगारा हॉटेल येथे वितरण वाहिनीला बसविलेला बुस्टर पंप काढण्यासाठी पालिकेकडून पाठपुरावा सुरु आहे. रिजन्सी अनंतर येथील संकुलाच्या पंप मधून उच्चदाबाने निर्धारीत वेळेत दावडी व गोळवली येथील पाणी पुरवठा सुरु करण्याचे काम सुरु आहे, असे कल्याण डोंबिवली महापालिकेने म्हटलं आहे.
२०१६ला आम्ही सर्वांनी १३ लाख रुपये जमा करून स्वखर्चाने पाईपलाईन आणली तरीही पाणी आम्हला योग्यरित्या आलेले नाही. याबाबत वारंवार पत्रव्यवहार केला. पाठपुरावा करून सुद्धा पाणी येत नसल्याने आज आमरण उपोषणाला बसलो आहोत.
वंदना सोनावणे, नागरिक
- काय म्हणणे आहे एमआयडीसीचे
एमआयडीसी कडून सांगण्यात येते की, या भागात पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी सर्वस्वी कल्याण डोंबिवली महापालिकेची असून एमआयडीसीने कोणतीही पाणी कपात केलेली नाही. उलट पाणी पुरवठ्यात वाढ केली आहे.